- किशोर गावडे
मुंबई : भांडुप पश्चिमेच्या मिश्रा भवन, गावदेवी रोड येथील नंदू भवन चाळी लगत गुरुवारी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास भूस्खलन होऊन येथील आधारभिंत कोसळली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आता महापालिकेच्या वतीने येथील अशोक मेडिकल मागील १६ घरांना नोटिसा बजावून धोकादायक भाग हटविण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच धोकादायक आणि पडका भाग तातडीने हटविण्यास सांगितले आहे.
ताबाधारकांनी (होल्डर ऑफ ऑक्युपन्सी) किंवा रहिवाशांनी त्यांच्या घराचा धोकादायक, घातक भाग तातडीने हटविण्याच्या सूचना पालिकेने केल्या आहेत. तसेच एखादी दुर्घटना घडल्यास, होणाऱ्या जीवित अथवा वित्तहानीस संबंधित मिळकतधारकाला जबाबदार धरले जाईल, अशी सूचना बजावलेल्या नोटिशीद्वारे करण्यात आली आहे.
नोटीस देण्यात आलेल्या काही घरांना तडे केले असून असाच संततधार पाऊस सुरू राहिल्यास घरांना धोका निर्माण होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या नोटीसमुळे आधीच जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, माजी आमदार अशोक पाटील व ईशान्य मुंबई महिला विभाग प्रमुख राजश्री मांदविलकर व शिवसेना पदाधिकारी यांनी पालिका प्रशासनाकडे तातडीने पर्यायी जागेची मागणी केली आहे.
बंद असलेल्या महापालिका शाळा, समाज मंदिरे या ठिकाणी पर्यायी व्यवस्थेबाबत माजी आमदार अशोक पाटील यांनी प्रशासनाला सुचवले आहे. पण नोटिसा मिळालेल्या नागरिकांनी संततधार पावसात जायचे कुठे? असा प्रतिप्रश्न अशोक पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केला आहे. पालिका प्रशासनाने लवकरात लवकर नागरिकांचे पुनर्वसन करावे अशी मागणी अशोक पाटील यांनी केली आहे.
शुक्रवारी पहाटेपर्यंत एनडीआरएफचे जवान व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी कार्यरत होते.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra