केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खरमरीत टीका
मुंबई : 'टिनपाटाच्या डब्याच्या चिरक्या ताशाच्या तडतडण्याचा दुसरा दिवस' अशा आशयाचे ट्विट करत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे.
आता भाजपाचे हिंदुत्व तपासायची वेळ आली असे ते म्हणतात. आधी तुमचं स्वत:चं पहा. काँग्रेसच्या काळात इस्लाम खतरे में है अशा आरोळ्या ठोकल्या जात होत्या हेही तुम्हीच म्हणता आणि त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आजही बसता. कुठे आहे तुमचे हिंदुत्व? मी स्वार्थासाठी पक्षाबाहेर जातो असे खरे सांगून जा असा उपदेश करणा-यांनी मी मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्व आणि साहेबांचे विचार सोडले हे सुध्दा स्पष्टपणे मान्य करावे.
भाजपमध्ये राम राहिला नाही, सगळे आयाराम-गयाराम म्हणणा-यांवर गावोगावी जाऊन दुस-या पक्षाच्या नेत्यांना शिवबंधन बांधण्याची वेळ का आली? महापौरांचे दालन मंत्रालयात ठेवायचे का विचारणा-यांनी स्वतः हडपलेल्या आलिशान महापौर बंगल्याचा हिशोब द्यावा. माझ्याकडे पक्षाचं नाव नाही, चिन्ह नाही, काहीही नाही म्हणणारे मणिपूर विषयावर माझी मदत घ्या म्हणतात. तुमचं अस्तित्वच काय?
पुतळे उभारून दुस-यांचे आदर्श चोरायचे म्हणणा-यांनी त्यांचे स्वतःचे आदर्श असलेल्या अटलजींचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास विरोध का केला याचे कारण जनतेला सांगावे. आज ते व्यापारी वृत्तीचा आरोप करतात. २०१४ ते २०१९ मध्ये सोबतीने काम करताना व्यापारी वृत्ती दिसली नाही का?
कोरोना काळातील कामाचे कौतुक करा म्हणणा-यांनी त्या काळात प्रेताच्या टाळूवटील लोणी खाल्ले, याचे कौतुक करायचे का? असे खरमरीत सवाल करीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांची पोलखोल केली आहे.