उमेश यादव – पुजाराला संघातून वगळले नसल्याचे बीसीसीआयचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १२ जुलैपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे भारतीय संघ आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया तिथे फक्त कसोटीच खेळणार नाही तर ३ वनडे आणि ५ टी-२० सामनेही खेळणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कॅरेबियन दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या कसोटी आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये अनेक बदल दिसून आले आहेत. विशेषत: कसोटीत, संघाचे २ सिनियर खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव यांची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील पराभवानंतर निवड झालेली नाही.
वेगवान गोलंदाज उमेश यादव याला डब्ल्यूटीसी फायनलमधील पराभवानंतर वगळण्यात आलेले नाही. उलट तो जखमी झाला आहे. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असून तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये बरा होत आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्राने दिली.
सध्या तरी या दोन्ही सिनियर खेळाडूंना कसोटी संघात स्थान मिळण्याचे दरवाजे बंद झालेले नाहीत. दोघांची कामगिरी टीम इंडियासाठी उत्कृष्ट ठरली आहे. बीएसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, ‘१५ महिन्यांसाठी वगळल्यानंतर अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा उपकर्णधार बनू शकतो, तर कोणीही पुनरागमन करू शकतो. ते पुढे म्हणाले, ‘तुम्हाला कुठेतरी बदलाची सुरुवात करायची आहे. निवडकर्त्यांना अशी परिस्थिती नको आहे की सर्व सीनियर एकाच वेळी मैदान सोडतील आणि ड्रेसिंग रूममध्ये अनुभवी खेळाडू नसतील’.
‘टी २०’ संघात रिंकू सिंगची एन्ट्री
आयपीएल २०२३ मध्ये आपल्या तुफानी फलंदाजीने दहशत निर्माण करणाऱ्या रिंकू सिंग याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या संघात संधी मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याची निवड होऊ शकते. रिंकूने आयपीएल २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या १४ सामन्यांमध्ये ५९.२५ च्या सरासरीने ४७४ धावा केल्या होत्या. या मोसमात त्याच्या नावावर ४ अर्धशतकेही आहेत. यूपीचा रिंकू लवकरच भारतासाठी पदार्पण करू शकतो.