जगण्यातला पाऊस

  169

मनातले कवडसे : रूपाली हिर्लेकर


घन घन माला नभी दाटल्या
कोसळती धारा...
आभाळाचा शॉवर ऑन झालाय आणि त्यात आपण सर्व मनसोक्त भिजण्यास तयार झालो आहोत. यावेळी पावसाचं आगमन जरा उशिराच झालंय. तरीही तो आल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटलंय. मनं उल्हसित झाली आहेत.


प्रखर उन्हाच्या झळा सोसून उष्णतेचे चटके घेत घेत घामाच्या धारा वाहत असताना माणूस एकटक आभाळाकडे डोळे लावून पावसाच्या धारांची चातकाप्रमाणे वाट पाहत असतो आणि तसाही प्रत्येक सजीव-निर्जीव घटक या वर्षा ऋतूचीच आतुरतेने वाट पाहत असतो.


गदिमांनी केलेलं वर्णन आठवतं -
माऊलीच्या दुधापरी
आले मृगाचे तुषार…
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार…...
तापलेली, तृषार्त धरती पहिल्या पावसाच्या थेंबांनी सुगंधित होते. तिचा मत्त गंध सर्वत्र दरवळू लागतो. पावसांच्या सरींसोबत मनातही नवचैतन्याचा वर्षाव होतो. पहिल्या पावसात भिजणारी लहान मुलं, त्यांचा तो नाच पाहून वाटतं, त्या मुलांसोबत पानं, फुलं, वेली, रस्ते, दगड, माती, सारेच चिंब होऊन नाचतायत. पावसाच्या सरींचं गाणं त्यात सामील होतं. त्यांना साथ देत मग सर्वजण ताल धरतात. धमाल करतात.


पण हा पाऊस कधीकधी आपल्याला अंतर्मुखही बनवतो. पावसाची रूपं आणि माणसाचा जीवनक्रम यात मला खूप साधर्म्य जाणवतं. बघा ना, आपलं बालपण कसं छान, निरागस, लोभसवाणं असतं. बाळ जसं हळूहळू रांगतं, त्याप्रमाणे पाऊसही थेंबा-थेंबांनी जणू रांगत आपल्याकडे येतो. जसं बाळ मोठं होऊ लागतं, तसाच पाऊसही जोरदार हवेसोबत आपला आवेग वाढवतो. तारुण्यात माणसाचा उत्साह उच्च कोटीला असतो. त्याचप्रमाणे पाऊस ढगांच्या गडगटासह, विजांच्या लखलखाटासह धुवांधार बरसत असतो. तारुण्याच्या ऐन उंबरठ्यावर असताना जसं आपण गुलाबी रंगात न्हाऊन निघतो,  तसाच पाऊसही हलके- हलके, रिमझिम-रिमझिम प्रेमधारांनी वर्षाव करू लागतो. माणूस पोक्त होऊ लागतो, बरे-वाईट अनुभव घेऊन स्थिर होतो. शांत होतो. त्याचप्रमाणे पाऊसही धुवांधार बरसून झाल्यावर शांत होतो. स्थिर होतो. असं हे पावसाचं आणि माणसाचं नातं किंवा रूप सर्वच स्तरांवर एकसारखं जाणवतं.


पाऊस कधी सुखद रिमझिम धारा, तर कधी भीषण वादळं घेऊन येतो. माणसाच्या आयुष्यातही सुखदुःखही पावसाच्या सरींप्रमाणे येतात आणि जातात. माणसाचं आयुष्य असंच पावसाच्या वेगासारखं आहे.


पाऊस म्हणजे नवनिर्मितीची चाहूल. माणूसही आयुष्यात बऱ्याच सर्जनशील गोष्टींचा नव्याने वेध घेतो. चुकतो-धडपडतो, पुन्हा उठतो-सुधारतो. हे चक्र आयुष्यभर चालूच राहातं. पावसाचंही तसंच. पाऊस येतो आणि जातो. पुन्हा त्याच वेळेप्रमाणे येतो आणि आसमंत बहरून टाकतो. चराचर सृष्टीला हिरवा साज चढवतो. आपण म्हणतो ना की, 'नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा!'


चला तर मग, आपल्या मनमोराचा पिसारा फुलवलेल्या या पावसाचा आपणही पुरेपूर आनंद घेऊ या आणि त्याच्याप्रमाणेच सर्वत्र आनंदाची बरसात करू या!

Comments
Add Comment

बालनाट्ट्यांनी मारली बाजी

भालचंद्र कुबल :पाचवा वेद यांदाचा बालनाट्याचा सीजन निर्मात्यांना चांगलाच लाभलाय अशी चर्चा सुरू असतानाच त्याचा

अशोक मुळ्येकाका, एक भन्नाट अवलिया !

योगेश वसंत त्रिवेदी:ज्येष्ट पत्रकार नमस्कार! या बरं झालं तुम्ही आलात. मी फक्त कळवलं. मला मेसेज पाठवता येत नाही. ते

तुझ्या माझ्या संसाराला ‘अष्टपदी’ हवी

मयूरी कापडणे मयूरी कापडणे या अभिनेत्रीचा ‘अष्टपदी’ चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. त्या चित्रपटामध्ये ती एका

अवधूत गुप्ते घेऊन आले आहेत ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बम

संगीतविश्वातील प्रसिद्ध गायक, संगीतकार व निर्माता अवधूत गुप्ते आपल्या चाहत्यांसाठी एक आगळा-वेगळा भावनिक अल्बम

वादळात पडलेली झाडे झाली पुन्हा जिवंत?

फिरता फिरता:मेघना साने लिबागच्या जवळ पोयनाड पेजारीमध्ये जे बांधण गाव आहे तेथे वादळ झाले, तेव्हा बरीच झाडे

१४ कलाकार, २४ भूमिका आणि नाट्याविष्कार...!

राजरंग : राज चिंचणकर रंगमंचावरचा पडदा उघडतो आणि नाट्यावकाशात नाटक फेर धरू लागते. समोर दिसणारे नेपथ्य, प्रकाश आणि