
मुंबई: महारेराकडून (MahaRERA) गृहनिर्माण प्रकल्पांमधील होणारा विलंब, त्यामुळे ग्राहकाला सोसावा लागणारा आर्थिक फटका, कालापव्यय आदींबद्दल बिल्डरांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. अशापैकीच एन. के. गार्डनचे विकासक भूपेश बाबू यांच्या मालमत्तेचा महारेराने लिलाव करून त्या प्रकरणातील ३४ तक्रारदारांना ४ कोटी ७८ लाख रुपयांचे वाटप केले. लिलावातून पैसे वसूल करून तक्रारदारांना नुकसानभरपाई मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. (Strict action against builder)
राज्यात आणखी काही ठिकाणी मालमत्ता जप्ती आणि लिलाव जाहीर होणार आहेत. महारेराने केलेल्या कारवाई अंतर्गत पनवेल क्षेत्रातील मोरबी ग्रामपंचायतीत २० एप्रिल रोजी हा लिलाव झाला होता. तसेच या लिलावानंतर आता नुकसानभरपाईसह ३४ पैकी ३० तक्रारदारांना तक्रारीचा खर्च म्हणून एकूण ६ लाख रुपये देण्यात आले आहेत. रायगड जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या सक्रियतेमुळे हे शक्य झाले आहे. भूपेश बाबू यांच्या मालमत्तांच्या लिलावात, या प्रकरणातील आधारमूल्य ३.७२ कोटी असताना लिलावात ४.८२ कोटींची बोली लागली. त्यामुळे ३४ तक्रारदारांना नुकसानभरपाईची मुद्दल रक्कम अदा करण्यात आली.