Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू’ असे नाव

वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू’ असे नाव

मुंबई ( प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू’ असे नाव देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. तसेच, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ देण्यात येणार आहेत, असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुंबईतील कोस्टल रोडला धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, तर वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली होती.

त्यानुसार १४ मे रोजी संभाजी महाराज जयंतीनिमित्त कोस्टला रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर रविवारी २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू’ असे नाव देण्यात आल्याची घोषणा एकनाथ शिंदेंनी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात अनेक कार्यक्रम सुरू आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि समुद्र यांचं नातं आहे. ते लक्षात घेऊन वांद्रे-वर्सोवा या समुद्र सेतूला ‘स्वातंत्र्यीवर सावरकर समुद्र सेतू’ अशा प्रकारचं नाव देण्याची निर्णय घेतला आहे.”

“तसेच, विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत, शौर्य दाखवणारे आणि संकटातून अनेकांची मुक्तता करणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वीरता’ पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

हेदेखील वाचा... 

Comments
Add Comment