
चुराचांदपूर : मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सचे सुमारे १० हजार जवान राज्यात तैनात करण्यात आले आहेत.
या हिसांचारात सुमारे १०० जण जखमी झाले आहेत. या ५४ मृतांपैकी १६ जणांचे मृतदेह चुराचंदपूर जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत, तर १५ मृतदेह जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, इम्फाळ पूर्व येथे आहेत. हे मृतदेह इम्फाळ पूर्व आणि पश्चिम, चुराचंदपूर आणि बिशेनपूर या जिल्ह्यांमधून आणण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर गोळ्या लागल्याने जखमी झालेल्या अनेकांवर आरआयएमएस आणि जवाहरलाल नेहरू मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार सुरू आहेत.
तणावग्रस्त भागात अडकलेल्या एकूण १३ हजार लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना लष्कराच्या छावण्यांमध्ये पाठवण्यात आले आहे. लष्कराच्या पीआरओने सांगितले की, सुरक्षा दलांच्या तत्पर कारवाईमुळे हिंसाचारग्रस्त भागातील विविध अल्पसंख्याक भागातील लोकांची सुटका करण्यात आली. चुराचंदपूर, कांगपोकपी, मोरे आणि ककचिंगमधील परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे.
भारतीय महिला बॉक्सर मेरी कॉमने ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली होती. मेरीने ट्विट केलं होतं. "माझं राज्य मणिपूर जळत आहे. कृपया मदत करा". तसेच या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना टॅग करत मणिपूरमधील जाळपोळ, हिंसाचाराचे काही फोटो शेअर केले होते. मणिपूरमध्ये लष्कर आणि सशस्त्र दलांच्या मदतीने हिंसाचार आटोक्यात आणण्यात आला. मणिपूरमध्ये पाच दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
#WATCH | Manipur violence aftermath: Long queues in front of petrol pump in Imphal (05/05) pic.twitter.com/AZAOOtlfWD
— ANI (@ANI) May 6, 2023