
विदर्भ : महाराष्ट्रातील विदर्भ भागातील गारपिटीमुळे २६ एप्रिलपासून यलो व ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार या भागात वार्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी राहील. राज्यात उर्वरित भागात मुंबई व नागपूर वेधशाळेने यलो अलर्ट जाहीर केला आहे. इथे वार्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी राहील.
मध्य प्रदेश, महाराष्ट्रापासून ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत सभोवतालच्या परिसरावर ९०० मीटर उंचीवर गोलाकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर महाराष्ट्रापासून ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा असल्याने पावसाचे वातावरण आहे.
नाशिक जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात वादळी गारपिटीमुळे फळबागांचे नुकसान झाले आहे. या भागात आणखी दोन दिवस गारपीट, अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा राहणार असल्याचा अंदाज इगतपुरी भात संशोधन केंद्र व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.
नांदेड, हिंगोली, परभणी व बीड, जालना जिल्ह्यात मंगळवारी गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यातील कंधार व किनवट तालुक्यात वीज पडून ५ जनावरे दगावली. हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे केळीच्या झाडांचे नुकसान झाले. मराठवाड्यात गारपीट, सोसाट्याच्या वार्यामुळे घरावरील पत्रे उडाले.

पुढील दोन दिवसांत हवामान खात्याने २७ एप्रिलला दक्षिणेकडील केरळ, तेलंगणमध्ये आणि २८ एप्रिलला ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, तेलंगण, प. बंगाल, सिक्कीम, ओडिशा, विदर्भ, दक्षिण छत्तीसगडमध्ये पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
पुढील आठवड्यात देशभरात उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात मार्च ते जूनपर्यंत उष्णतेची लाट असते. मान्सून उशिरा सुरु झाल्यास जुलैमध्येदेखील उष्णतेच्या लाटेची परिस्थिती असते. यंदा एप्रिल महिन्यात तीव्र ऊन कमी प्रमाणात होते. शिवाय पुढील आठवड्यात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.