उर्वरीत महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाची शक्यता
रत्नागिरी : राज्यातील अवकाळी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही, असे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजावरुन निदर्शनास येते. आज सकाळी रत्नागिरी जिल्ह्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
कोकणात पुढचे काही तास तर उर्वरीत महाराष्ट्रतही काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा आठवडाही चिंताजनक ठरु शकतो.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज सकाळी (१७ एप्रिल) वर्तवलेल्या नियमीत बुलेटीनंध्ये रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह वादळी पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. या वेळी ताशी ३० ते ४० किमी वेगावे वाहू लागेल, असाही अंदाज वर्तवला आहे.
यलो अलर्ट जारी केलेले कोकणातील जिल्हे
यलो अलर्ट- पालघर- मंगळवार आणि बुधवार
यलो अलर्ट- ठाणे आणि रत्नागिरी- बुधवार
यलो अलर्ट- सिंधुदुर्ग- बुधवार आणि गुरुवार
यलो अलर्ट काळात कोकणात मेघगर्जनेसह दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
मुंबईतील वातावरण कोरडे राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो.
उर्वरीत महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उर्वरीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावू शकतो. यात धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही पाऊस आपली वृष्टी कायम ठेऊ शकतो. चंद्रपूर, बुलडाणा, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती आणि अकोला आदी जिल्ह्यातही मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या तीन दिवसांमध्ये सलग किंवा खंड देऊन पर्जन्यवृष्टी होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.