नवी दिल्ली (वृत्तसंस्था): केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनूसार देशात कोविड-19 प्रकरणांची वाढ झाली असून गेल्या २४ तासांत देशात ३ हजार ०९५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार २०८ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ५ मृत्यू झाले असून त्यापैकी गोवा आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एक आणि केरळ मधले तीन जण आहेत.
महाराष्ट्रात कोविडचे ६९४ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्ण संख्या आता ३ हजार ०१६ इतकी झाली आहे. तसेच राज्यात ३० दिवसांत सक्रिय कोविड प्रकरणांमध्ये १५ पट वाढ झाली असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये गेल्या चार आठवड्यांत कोविड प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रातील ५३ टक्के कोविड प्रकरणे पुणे आणि मुंबईत आहेत. परंतु, ओमायक्रॉनचा सबवेरियंट XBB.1.16 ची प्रकरणे औरंगाबाद, गोंदिया आणि अकोला यांसारख्या जिल्ह्यांमध्ये वाढली असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या माहितीत समोर आले.