
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
नागपूर : छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात आज रात्री दोनच्या सुमारास दोन गटात राडा झाला. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचेही बघायला मिळाले. दरम्यान, संभाजीनगर येथील घटना दुर्दैवी आहे, आता संभाजीनगर येथील परिस्थिती नियंत्रणात असून सर्वांनी शांतता राखवी, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
संभाजीनगरमधील तणाव आता निवळला आहे. आम्ही त्याकडे लक्ष ठेऊन आहोत. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही संभाजीनगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच तणाव निर्माण होईल, असे वर्तन कोणीही करू नये. सर्वांनी शांतता ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, आज महाराष्ट्रासह देशभरात राम नवमीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. रामनवमीनिमित्त संपूर्ण राज्यात विविधकार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर, नाशिक, सातारा, शिर्डी, शेगाव, मुंबईसह राज्यभरातील राम मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी बघायला मिळते आहे. दरम्यान, दरवर्षी प्रमाणे यंदाही शिर्डीत रामनवमी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.