
मुंबई: अध्यात्मिकदृष्ट्या देशात अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या व अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावे तसेच वेतनातील फरक त्वरित द्यावा अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली आहे.
थोरात म्हणाले की, शिर्डी साई संस्थानातील सुमारे ५९८ कंत्राटी कर्मचारी साधारणपणे २० ते २२ वर्षांपासून सेवेत आहेत. मागील काळात १ हजार ०५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू केले मात्र हे ५९८ कर्मचारी अजूनही कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. कायम सेवेतील कर्मचाऱ्यांना ४० हजार रुपये वेतन मिळते तर कंत्राटी कामगारांना १० हजार रुपयांवर काम करावे लागत आहे. या तुटपूंज्या पगारावर त्यांचा घरखर्च तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागत नाही. गेल्या २० वर्षांपासून हे कामगार अन्याय सहन करत आहेत. सरकार याप्रश्नी सकारात्मक आहे असे म्हणत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सेवत कायम करुन घ्यावे व ऑगस्ट २००९ पासून पूर्वलक्षी प्रभावाने वेतनाचा फरक देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, असेही थोरात म्हणाले.