Saturday, March 7, 2026

जनतेला लुटणाऱ्यांना हिशोब द्यावाच लागेल!

जनतेला लुटणाऱ्यांना हिशोब द्यावाच लागेल!

किरीट सोमय्या यांचा घणाघाती वार

मुंबई - उद्धव ठाकरेंचे भागीदार रवींद्र वायकर यांनी लहान मुलांच्या खेळाच्या मैदानावर ५०० कोटी रुपयांचे हॉटेल बांधले. अनिल परब, सदानंद कदम यांच्यावर कारवाई सुरू आहे. अनिल परबांवर तर तब्बल १२ खटले आहेत. राज्यातील जनतेला लुटणाऱ्या लुटारूंना हिशोब द्यावाच लागेल, अशा शब्दांत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटावर घणाघाती वार केला.

ते पुढे म्हणाले, १ डझन नेत्यांची आताही चौकशी, कारवाई सुरू आहे. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. हसन मुश्रीफांनी कोट्यवधीची लूट केलीय, भ्रष्टाचार केला हे सत्य आहे. आयकर, ईडी, सीबीआय, सहकार मंत्रालयाने सगळ्यांनी चौकशी केली. हा घोटाळा १०० कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कारवाई तर होणारच.

४० हजार शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केलीत. शेतकऱ्यांकडून १० हजार घेतलेत. ते शेतकरी कुठे आहेत? सेटलमेंटचे अर्ज का केले? आयकर खात्याच्या ऑर्डरविरोधात हायकोर्टात कोण गेले? चोरी केली ती पकडली गेली त्यामुळे आता सेटलमेंटची भाषा करावी लागली असा आरोप हसन मुश्रीफ यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून कोट्यवधीचे बोगस कर्ज घेतले ते परत करा. चोरी केली ही कबूल करा. शिक्षेला सामोरे जा. हसन मुश्रीफांवर अडीच वर्षाच्या काळापासून कारवाई सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी कारवाई दाबण्याचा प्रयत्न केला. आता हे घोटाळे बाहेर आले. भाजपा नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते मग कारवाई का केली नाही. आजही पुरावे असतील तर कोर्टात जा, संबंधित यंत्रणांना भेटा असं आव्हान किरीट सोमय्यांनी विरोधकांना केले आहे.

Comments
Add Comment