
- प्रा. प्रवीण पांडे, अकोला
पिंपळगाव येथे श्री गजानन महाराज आले या गोष्टीचा गावकरी मंडळींना खूप आनंद वाटत होता. शेगाव हे बाजाराचे गाव असल्यामुळे मंगळवारी पिंपळगावचे गावकरी शेगाव येथे बाजार करण्याकरिता गेले त्यावेळी त्यांनी अत्यंत हर्षाने आमच्या गावात देखील एक अवलिया साधू आले आहेत आणि ते थोर अधिकारी संत आहेत असे सांगितले. बाजार स्थळी ही चर्चा होत असल्याने हे सर्व वर्तमान गावात कळले. परम भक्त बंकटलाल ह्यांना ही वार्ता कळताच पत्नीस घेऊन ते लगेच पिंपळगाव येथे गाडी घेऊन निघाले. पिंपळगाव येथे येऊन त्यांनी श्री महाराजांना शेगाव येथे परत चालण्याची विनंती केली व श्री महाराजांना गाडीत बसवून शेगाव येथे जाण्यास निघाले. त्या वेळी त्यांनी पिंपळगावमधील लोकांना श्री बंकटलाल हे कृष्णाला गोकुळात न्यावयास आलेल्या अक्रूराप्रमाणे भासले. त्यावेळी बंकटलालांनी लोकांची समजूत घातली की श्री महाराज कोठे लांब चालले नाहीत. शेगाव तुमच्या गावाजवळच आहे. आपण केव्हाही दर्शनाला यावे. बहुधा श्री बंकटलाल हे पिंपळगावच्या लोकांचे सावकार असल्यामुळे लोकांना बंकटलाल ह्यांना नाही म्हणायची छाती झाली नाही.
श्री महाराज गाडीत बसले व बंकटलाला सोबत शेगाव येथे जाण्याकरिता निघाले. त्यावेळी श्री महाराज बंकटलालास म्हणाले:
पथी जाता गुरू मूर्ती बोलली बंकटलालाप्रती l ही का साहुची होय रीती l माल दुसऱ्याचा बळे न्यावा ll ७० ll मशी यावया तुया घरी l भय वाटते अंतरी l तुझ्या घरची नाही बरी l रीत हे मी पाहतो ll७१ll लक्ष्मी जी लोकमाता l महाविष्णूची होय कांता l जिची अगाध असे सत्ता l तिलाही त्वा कोंडिले ll ७२ ll तेथे माझा पाड कोण l म्हणून गेलो पळून l जगदंबेचे पाहून l हाल, माझे चित्त भ्याले ll७३ll गुरुरायांची अशी वाणी ऐकून बंकटलाल ह्यांना हसू आले आणि अत्यंत विनयाने ते श्री महाराजांना म्हणाले: ऐसे ऐकता हसू आले l बंकटलाला प्रती भले l विनयाने भाषण केले l ते ऐका साव चित्ते ll७४ll बंकट बोले गुरुनाथा l माझ्या कुलपा न भ्याली माता l आपला वास तेथे होता l म्हणून झाली स्थिर ती ll७५ll जेथे बाळ तेथे आई तेथे दुज्या पाड काई? आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत तेच माझे धन थोर l म्हणून आलो इथवर l माझे न उरले आता घर l ते सर्वस्वी आपुले ll७७ll घर मालक कारण l शिपाई आडवी कोठून l जैसे तुमचे इच्छिल मन l तैसेच तुम्ही वागावे ll७८ll इतकीच माझी विनंती l शेगावी असो वस्ती l धेनु काननाते जाती l परी येती घरी पुन्हा ll७९ll तैसेच तुम्ही करावे l अवघ्या जगा उद्धरावे l परीआम्हा न विसरावे l शेगावी यावे वरचेवर ll८०ll ऐसी घालून समजूत l शेगावी आणले गजानन l तेथे नाही दिवस राहून l निघून गेले पुनरपि ll८१ll
अश्या प्रकारे श्री महाराजांना बंकटलाल ह्यांनी पुन्हा शेगावी आणले. वरील दहा ओव्यांमधून गुरू व शिष्य संवाद कसा झाला व असावा हे संत कवी श्री दासगणू महाराजांनी फार छान दाखविले आहे. श्री बंकटलाल हे धनाढ्य सावकार असून देखील गुरू चरणी किती विनयशील होते हे देखील दिसून येते. भाव तेथे देव ह्या उक्ती प्रमाणे त्यांच्या मनीचे भाव ओळखून श्री गजानन महाराज पुनश्च शेगावी परत आले.
क्रमशः
[email protected]