नवी दिल्ली : बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने (आयटी) छापेमारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६० ते ७० अधिकाऱ्यांचा समावेश असणारे आयटी विभागाचे एक पथक मंगळवारी सकाळीच बीबीसीच्या कार्यालयात धडकले. त्यानंतर त्यांनी तातडीने कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे फोन बंद केले. तसेच कार्यालयाबाहेर येण्या-जाण्यावरही बंदी घातली आहे.
प्राप्तिकर विभागाचे अधिकारी सध्या बीबीसीच्या कार्यालयातील विविध रेकॉर्ड्सची पडताळणी करत असल्याची माहिती आहे.
केंद्राने बीबीसीच्या डॉक्यूमेंट्री इंडिया 'द मोदी क्वेश्चन'च्या प्रसारणावर बंदी घातली होती. ही डॉक्यूमेंट्री २००२च्या गुजरात दंगलीवर आधारित होती. केंद्राच्या बंदीनंतरही बीबीसीने ही डॉक्यूमेंट्री काढून टाकली नव्हती. त्यामुळे या प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली होती. पण, सुप्रीम कोर्टाने यासंबंधीची याचिका फेटाळून लावत सेन्सॉरशिप लादण्यास स्पष्ट नकार दिला होता.