Wednesday, July 3, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबईत मुले पळवणारी टोळी गजाआड

मुंबईत मुले पळवणारी टोळी गजाआड

कांजूर मार्ग पोलिसांनी सलग ११ दिवस पाठलाग करत केली चिमुरड्यांची सुटका

मुंबई : भीक मागण्यासाठी मुलांचे अपहरण करणाऱ्या एका टोळीला कांजूर मार्ग पोलिसांनी गजाआड केले आहे. फुटपाथवर राहणाऱ्या वर्षा कांबळे हिच्या दोन मुलांचे अपहरण करण्यात आले होते. या दोन मुलांची सुटका करण्यासाठी पोलिसांनी तब्बल ११ दिवस आरोपींचा पाठलाग केला आणि अखेर त्यांची सुटका करून दोन्ही मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

कांजूर मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत कांजूर रेल्वे स्थानक फुटपाथवर राहणाऱ्या वर्षा कांबळे हिचा पाच वर्षाचा मुलगा आणि एक वर्षाची मुलगी या दोघांचे अपहरण करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी पुण्याहून मुंबईकडे येताना ट्रेनमध्ये वर्षाची काळे कुटुंबीयांशी ओळख झाली होती आणि त्यांनीच आपल्या मुलांचे अपहरण केले असल्याचे तिने पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर काळे कुटुंबीयांचा ठाणे, कोल्हापूर, सांगली, नगर, औरंगाबाद या शहरात शोध घेऊन पाठलाग केला आणि यांच्यातील मुख्य आरोपी हर्षद काळे याच्यासोबत ताराबाई काळे चंदू काळे या दोघांना ताब्यात घेतले.

हर्षद काळे याची बायको पौर्णिमा काळे ही सध्या फरार आहे. वर्षा हिच्या दोन मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. पोलीस चौकशीत या दोन मुलांचे अपहरण भीक मागण्यासाठी केले असल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. परंतु त्यानंतर पुढे या मुलांचे हे लोक काय करायचे आणि आतापर्यंत अशा किती मुलांचे त्यांनी अपहरण केले आहे याचा तपास सध्या कांजूर मार्ग पोलीस करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -