Saturday, July 5, 2025

अब मदत करने वाला कोई नही

अब मदत करने वाला कोई नही

इंग्रजांविरुद्ध इ. स. १८५७-५८ चे बंड फसेल, अयशस्वी होईल हे श्री स्वीमींनी अगोदरच एरंडाच्या लाकडाच्या पलटणी तयार करण्याच्या खेळातून सूचित केले होते. झालेही तसेच. बंडाची रणधुमाळी थांबली. इंग्रज सरकारने ती कठोरपणाने मोडून काढली. नंतर श्री स्वामींचा तोफेच्या तोंडात तोंड खुपसून बसण्याचा वर लीलेत वर्णन केलेला खेळ झाला. तेव्हाही लोकांना श्री स्वामींच्या या कृतीचा अर्थ कळेना. पण, लगेच इंग्रज सरकारने या उठावात सामील झालेल्यांची कसून चौकशी सुरू केली. जे-जे त्यात सामील झाल्याचे त्यांना आढळले, त्या सर्वांना तोफेच्या तोंडी देण्याचा सपाटा इंग्रज सरकारने लावला.


प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उठावात सामील होणाऱ्यांना जेव्हा तोफेच्या तोंडी देण्याच्या शिक्षा होऊ लागल्या, तेव्हा लोकांना श्री स्वामी समर्थांच्या या खेळाचा अर्थबोध झाला. नंतर अनेक राजे-राजवाडे, संस्थानिक यांच्यावर उठावात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सामील झाल्याचा, मदत केल्याचा वहीम येऊन शिक्षा झाल्या. अशा अवस्थेत रोहिल्यांनीही बंड केले. त्यात त्यांनी हिंदू रयतेची लुटालूट केली. त्यांच्यावर अत्याचारही केले. सर्वच हवालदिल झाले होते. ते सर्व ऐकून श्री स्वामी समर्थ म्हणाले, ‘अब कुछ हिंदू का रहा नहीं.


हाथी गया, घोडा गया, पालखी गयी, सबकुछ गया.’ याचा मथितार्थ समजावून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वत्र माया-ममतेचे राज्य असताना, त्याचाच प्रभाव, घर-प्रपंच-संसार-व्यवहार-उद्योग असताना त्या विरुद्ध उठाव अथवा बंड करण्यास कमालीचा निग्रह आणि नियोजनबद्धता लागते.’ दररोज आम्हा युद्धाचा प्रसंग’ या संत उक्तीनुसार सदैव संघर्षशील असावे लागते. यात काही यशस्वी होतात, तर बरेच जण अयशस्वी होतात. कारण सर्व प्रकारच्या या मायाजालाविरुद्धचे युद्ध वा बंड सोपे नसते. ते मोडून काढण्यासाठी मनोनिग्रह आवश्यक असतो. तो जर नसला तर मायेचा विजय होतो आणि पराभुताची अवस्था बिकट होते. या लीलेतून श्री स्वामींनी आपणा सर्वांस सावधान केले आहे. ‘निग्रहाने, सातत्याने मायाजालाविरुद्ध लढा, हरलात तर दुःख आणि दुःख. मरणप्राय: यातना. जिंकलात तर चिरंतन आनंद आणि सुख-समाधान.’


-विलास खानोलकर

Comments
Add Comment