मुंबई : मुंबईकरांवर आज मंगळवारपासून वाहतुकीच्या आणखी एका नियमाची सक्ती करण्यात येणार आहे. चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आता सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र लोकांमध्ये अद्याप सीट बेल्ट संदर्भात जनजागृती नसल्याने सीटबेल्टसाठी मुदत आणखी वाढवण्यात आलेली आहे. त्यानुसार, या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर मंगळवारपासून दंडात्मक कारवाई न करता केवळ वाहतूक पोलिसांकडून कडक समज देण्यात येणार आहे. तर सीटबेल्ट सक्तीबाबत दंडात्मक कारवाई ११ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी दिले आहेत.
सर्व ट्रॅफिक युनिटला दहा दिवस वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यास सांगितले आहे. दहा दिवसांनंतर मात्र चालक आणि मागे बसलेले प्रवासी सीटबेल्टशिवाय आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
मुंबईत अनेक कारचालकांनी अद्यापही सीटबेल्ट बसवलेले नाहीत. त्यामुळे सीटबेल्ट संदर्भात आज पासून फक्त समज दिली जाणार आहे. सीटबेल्टच्या सक्तीमधून जुन्या वाहनांना तात्पुरते वगळण्यात आले आहे, अशी माहिती देखील वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईत टॅक्सीमेन्स युनियनने सीटबेल्टच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. काळी-पिवळी टॅक्सीचालकांना चार प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. मात्र पाठीमागे तीन प्रवासी बसत असल्याने तसेच कार उत्पादकांनी मागच्या दोनच सीटना सीट बेल्टची सुविधा दिल्याने तिसरा प्रवासी सीट बेल्ट लावू शकत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी टॅक्सीची खासगी कारसोबत तुलना करू नये असे पत्र मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने वाहतूक विभागाला लिहिले आहे.