कल्याण (वार्ताहर) : बनावट बांधकाम परवानगी आदेश बनवून फसवणूक केल्याप्रकरणी केडीएमसीकडून मानपाडा पोलीस ठाण्यात एकाच वेळी २७ विकासकांकांवर गुन्हे दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल असून केडीएमसी आयुक्तांकडे तक्रार अर्जही सादर करण्यात आला आहे. यानंतर केडीएमसीकडून झालेल्या पडताळणीमध्ये बांधकाम परवानग्या बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील २७ गावांमधील २७ बांधकाम आणि डोंबिवली विभागातील ३९ बांधकाम परवानग्या असे मिळून एकूण ६७ बांधकाम परवानगी आदेश बनावटरित्या तयार करण्यात आले असून त्यावर कारवाई करण्याचे आर्किटेक्ट संदीप पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेमध्ये नमूद केले आहे. तसेच या बांधकाम परवानग्यासंदर्भात पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांकडेही लेखी तक्रार केली आहे. त्यावरून केडीएमसीच्या नगर रचना विभागातील सहाय्यक संचालकांनी या बांधकाम परवानग्या तपासल्या असता त्या बनावट असल्याचे आढळून आल्याचेही पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यासंदर्भात केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, अशा प्रकारे एकूण ६८ परवानग्या बनावट कागदपत्रे तयार करून दिल्या गेल्याचे संबंधित विकासकांनी भासवले आहे. तसेच या परवानग्यांच्या आधारावर त्यांनी रेराकडेही रजिस्ट्रेशन केल्याची माहिती आयुक्त डॉ. दांगडे यांनी दिली.