पालघर (प्रतिनिधी) : यंदा सण उत्सवाचे दिवस आले असून बाजारपेठाही सजल्या आहेत. नूकतेच गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून आरस तसेच मंडप सजावटीसाठी फुलांची मागणी वाढली आहे. मात्र हवामान बदल आणि कोरोनामध्ये बंद असलेला व्यवसाय यामुळे फुल मार्केटला याचा फटका बसला होता. तर वसई, विरार, पालघर पट्ट्यात फुलांची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. त्यांनाही मागील दोन वर्षांपासून नुकसानाला सामोरे जावे लागले होते.
यंदा मात्र फुल मार्केट बहरले असून मागणीत देखील वाढ झाली आहे. मात्र यंदा सर्वच वस्तू महाग झाल्याने फुलांच्या किमती देखील वधारल्या आहेत. यामध्ये तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झाल्याने व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
विरार भागातील पश्चिम पट्टय़ात मोठ्या प्रमाणात फूल बागायतींची शेती केली जाते. या बागांमध्ये फुलणारी फुले येथील शेतकरी व व्यावसायिक मुंबईच्या दादर येथील बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जातात. दररोज या भागातून एक हजाराहून अधिक किलो फुलांचा माल विक्रीसाठी जात असतो. सणासुदीच्या काळात या भागातील फुलांना दादर येथील फुलबाजारात मोठी मागणी असते. यात मोगरा, चाफा, झेंडू, जास्वंद, शेवंती, गुलाब अशा विविध फुलांचा समावेश आहे. मागील दोन वर्षे करोनाचे संकट असल्याने हवी तशी बाजारपेठ मिळाली नव्हती. यंदा सर्व निर्बंध शिथिल झाले असल्याने बाजारपेठाही बहरल्या असल्याचे फूल व्यावसायिकांनी सांगितले आहे.
गणेशोत्सवात देवाला वाहण्यासाठी, तोरण व इतर सजावटीसाठी फुलांचा वापर होतो. त्यामुळे बाजारात दोन ते तीन दिवसांपासून फुलांची मागणी वाढली असल्याने त्यांच्या किमतीही वधारल्या आहेत. अडीचशे ते तीनशे रुपये किलोने विक्री केला जाणारा मोगरा हा पाचशे ते सहाशे रुपये किलोने विक्री होऊ लागला आहे.
श्रावण महिन्यात असे वाटले होते फुलांना चांगला भाव मिळेल, परंतु त्या वेळीही फुलांचे बाजारभाव हे कमीच होते. आता गणेशोत्सव असल्याने दोन दिवसांपासून फुलांचे भाव वाढत असल्याचे फूल व्यावसायिक अतुल म्हाले यांनी सांगितले आहे.