शहापूर (वार्ताहर) : शहापूर तालुक्यातील संपन्न निसर्गसंपदा दिवसेंदिवस पर्यटकांना आकर्षित करत असून दिवसेंदिवस पर्यटकांचा ओढा शहापूर तालुक्यातील तानसा, वैतरणा व भातसा परिसरात वाढत आहे. त्यातच मुंबईपासून केवळ हाकेच्या अंतरावरील या ठिकाणांना पर्यटकाकडून चांगलीच पसंती मिळत असल्याने घरापासून एक ते दोन तासाच्या अंतरावर असणारी पर्यटनस्थळे पर्यटकांना उपलब्ध करून द्यावीत, या विचारातून शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्य क्षेत्रात चार नवीन पर्यावरणस्नेही पर्यटन स्थळे विकसित करण्याचा विचार वन्यजीव विभागाने सुरू केला आहे. तानसा, क्वारीपाडा, माहुली, सूर्यमाळ भागातील स्थळांचा यात समावेश असणार आहे.
मुंबईपासून जवळ असलेल्या पर्यटन स्थळांना शहरी नागरिक सर्वाधिक पसंती देतात. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, पनवेलपासून तानसा अभयारण्य केवळ १ ते २ तासाच्या अंतरावर आहे. देश, परदेशातील पर्यटक येथे येण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने ही स्थळे विकसित केली जाणार आहेत. तानसा अभयारण्यातील पर्यावरणपूरक पर्यटन स्थळे विकसित करण्यामागील मुख्य उद्देश असल्याने निसर्गाबद्दल पर्यटकांनाही ओढ निर्माण होऊन निसर्गाचे जतन करण्याविषयीची जागृती या निमित्ताने होणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा धरणाचे हे लाभक्षेत्रात समावेश असणार आहे.
जंगलातील विविध निर्जीव संपदा आकर्षित पद्धतीने रंगवून त्यावर सुरक्षित सेल्फी पॉइंट तयार करणे, लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान विकसित करणे, महत्त्वाची झाडे, फुलपाखरे, प्राण्याची छायाचित्र पर्यटन स्थळी लावली जाणार आहेत. मार्गदर्शन केंद्र पर्यटनकेंद्रात जंगल भ्रमंती, वन्यजीव, वनसंपदा अभ्यासक आणि मार्गदर्शक, पक्षी, प्राणी निरीक्षण मनोरे, जैवविविधता आदींचा समावेश असणार आहे.