सर्वेश सोमण
शेअर बाजार उच्चांकाला असतानाच मागील आठवड्याच्या सलग सुट्ट्या संपत असतानाच १४ ऑगस्टला अत्यंत दु:खद बातमी समोर आली आणि साधारणपणे मागील काही दशकांपासून गुंतवणूक करीत असलेले तसेच नव्याने सुरुवात केलेले आणि करू पाहणारे या सर्वांनाच अत्यंत दु:ख झाले. याला कारणही तसेच होते ते म्हणजे बिग बुल, अर्थात राकेश झुनझुनवाला यांचे निधन. राकेश झुनझुनवाला हे नाव शेअर बाजारात असलेल्यांना नवीन नाही. मलादेखील या व्यक्तीची मोहिनी पडली ती साधारण १५ वर्षांपूर्वीच. आजच्या माझ्या लेखातून या अफलातून, अभ्यासू, माणसाला श्रद्धांजली आणि त्रिवार वंदन.
राकेश झुनझुनवाला यांचा जन्म ५ जुलै १९६० रोजी झाला. राकेश झुनझुनवाला एक भारतीय अब्जाधीश व्यापारी, शेअर व्यापारी, गुंतवणूकदार आणि व्यवसायाने सीए होते. त्यांनी १९८५मध्ये ५ हजारच्या भांडवलासह गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, १९८६ मध्ये त्यांचा पहिला मोठा नफा होता. त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची अंदाजे निव्वळ संपत्ती जवळपास ४५ हजार करोड होती, ज्यामुळे ते जगातील ४३८वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. त्यांच्या स्वत:च्या मालमत्ता, व्यवस्थापन फर्म तसेच अनेक इतर एंटरप्रायझेसमध्ये भागीदार होते. सक्रिय गुंतवणूकदार असण्यासोबतच त्यांनी अनेक कंपन्यांचे अध्यक्ष आणि संचालक म्हणून काम केले. ते अकासा या एअर कंपनीचे संस्थापकही होते. आतल्या व्यापारासाठी त्याची चौकशी करण्यात आली आणि २०२१ मध्ये सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) सोबत सेटलमेंट झाली. झुनझुनवाला यांना भारताचे वॉरेन बफेट किंवा भारताचा मोठा बुल म्हणून संबोधले जाते ते त्यांचा अंदाज आणि दीर्घमुदतीचा दृष्टिकोन यामुळेच.
राकेश झुनझुनवाला हे मुंबईत राजस्थानी मारवाडी कुटुंबात वाढले, जिथे त्याचे वडील आयकर आयुक्त म्हणून काम करत होते. राकेश झुनझुनवाला यांना स्टॉक मार्केटमध्ये रस निर्माण झाला, जेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांना त्यांच्या मित्रांसोबत बाजारावर चर्चा करताना पाहिले. त्याच्या वडिलांनी त्यांना मार्केटमध्ये मार्गदर्शन केले. मात्र सुरुवातीला कधीही गुंतवणुकीसाठी पैसे दिले नाहीत व मित्रांकडे पैसे मागण्यास मनाई केली. त्यानंतर त्यांनी १९८५ मध्ये ५ हजार भांडवलापासून सुरुवात केली, राकेश झुनझुनवालाचा पहिला मोठा नफा १९८६मध्ये ५ लाखांच्या रूपात आला. ज्यामध्ये त्यांनी “टाटा टी” या कंपनीची खरेदी आणि विक्री केलेली होती. १९८६ ते १९८९ दरम्यान, त्यांनी जवळपास २०-२५ लाख नफा कमावला. त्यानंतर १९९०ला बजेट येणार होते. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणारे जवळपास सर्वांनाच या बजेटमधून शेअर बाजारासाठी फार काही नाही असेच वाटत होते. मात्र तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग आणि बजेट सादर करणारे वित्तमंत्री मधु दंडवते हे या बजेट मधून शेअर बाजारासाठी नक्की चांगल्या गोष्टी करतील, असा विश्वास बाळगणारे होते राकेश झुनझुनवाला. बजेट आले आणि त्यानंतर शेअर बाजाराने मोठी तेजी दाखविली. ज्यामध्ये यांनी जवळपास ४ कोटी इतका मोठा नफा कमाविला. २०२२ पर्यंत त्यांची गुंतवणूक जवळपास ४५ हजार कोटी झाली होती. त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक टायटन कंपनीत होती. त्यापाठोपाठ ल्युपिन आणि क्रिसिल या कंपन्यांचा नंबर लागतो. त्यांनी त्यांच्या मालमत्ता व्यवस्थापन फर्म, रेअर एंटरप्रायझेसमध्ये भागीदार म्हणून स्वतःचा पोर्टफोलिओ व्यवस्थापित केला.
सक्रिय गुंतवणूकदार असण्यासोबतच झुनझुनवाला हे अॅपटेक लिमिटेड आणि हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रा.लि.चे अध्यक्ष होते. प्राइम फोकस लिमिटेड, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, बिलकेअर लि., प्राज इंडस्ट्रीज लि., प्रोव्होग इंडिया लिमिटेड, कॉन्कॉर्ड बायोटेक लि., इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज (आय) लि., मिड डे मल्टिमीडिया लि., नागार्जुन कन्स्ट्रक्शन लि., या कंपनीच्या संचालक मंडळावर बसले. व्हाईसरॉय हॉटेल्स लि. आणि टॉप्स सिक्युरिटी लिमिटेड ते भारताच्या आंतरराष्ट्रीय चळवळीच्या संयुक्त राष्ट्रांच्या (I.I.M.U.N.) सल्लागार मंडळाचे ते सदस्य होते.
२०२१ मध्ये, त्यांनी जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांच्यासमवेत अकासा ही भारतातील कमी किमतीची विमान कंपनी सह-स्थापना केली. नवीन एअरलाइनकडे २ विमाने आहेत. आणखी ७० विमानांसाठी अतिरिक्त ऑर्डर आहे. याच महिन्यात त्यांच्या विमानांनी उड्डाण केले आहे. या माणसाने जे केले ते खरंच सर्वसामान्यांना अशक्यप्रायच. मग हे या माणसाला कसे बरे साध्य झाले असावे? ज्यावेळी मी वैयक्तिक या गोष्टीचा विचार करतो त्यावेळी लक्षात येते, हे शक्य झाले ते त्यांच्या दीर्घमुदतीच्या दृष्टिकोनामुळेच.
राकेश झुनझुनवाला हा माणूस खरंच याबाबत अफलातून. आपण एखादा शेअर खरेदी केल्यावर त्यामध्ये थोडीफार वाढ किंवा घट झाल्यावर आपण लगेच चलबिचल होतो. मात्र या माणसामध्ये जो संयम होता तोच त्यांना सर्वात यशस्वी करून गेला. त्यांची सर्वात जास्त गुंतवणूक असणारी कंपनी टायटन. ज्यामध्ये त्यांनी हा शेअर केवळ ३ रुपये किमतीला असतानाच खरेदी केला होता. त्यानंतर आजपर्यंत या खरेदी केलेल्या शेअरमधील एकही शेअर या माणसाने विकलेला नाही. टायटन ३ रुपये किमतीवरून ३०० रुपये झाला, तरीही हा माणूस शांत आणि संयम ठेवून बसला. त्यानंतर ३००चा ३००० झाला, तरीही यांनी आपला संयम कायम ठेवला. इतका संयम आणि तोदेखील जवळपास २५ ते ३० वर्षे ठेवायचा तो याच माणसाने. या माणसाने अफाट संपत्ती कमाविली आणि त्यामधील काही संपत्ती दानही केली. शेअर बाजारासोबत यांनी इंग्लिश विंग्लिश, कि अॅण्ड का, शामिताभ या चित्रपटांची निर्मितीही केली. यांची तुलना नेहमीच जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक यशस्वी गुंतवणूदार वॉरेन बफेट यांच्यासोबत केली गेली. मात्र दोघेही आपापल्या ठिकाणी ग्रेटच!! या दोघांचा जर अभ्यास केला, तर लक्षात येईल की, वॉरेन बफेट यांनी जी संपत्ती कमावली ती साधारण २२ ते २३ टक्के वार्षिक कंपाऊंड रिटर्नने कमावली, तर राकेश झुनझुनवाला यांनी सरासरी ४८ ते ४९ टक्के वार्षिक कंपाऊंड रिटर्नने कमावली. याबाबत राकेश झुनझुनवाला हे बफेटपेक्षा नक्कीच उजवे ठरले. राकेश झुनझुनवाला यांना जर बफेटइतके आयुष्य मिळाले असते, तर त्यांनी बफेट यांना नक्कीच मागे टाकले असते. पण हे होणे नियतीला मान्य नव्हते. शेअर बाजारावर नितांत प्रेम करणाऱ्या या माणसाने मार्केटला सुट्टी असतानाच अखेरचा श्वास घेतला आणि आर. जे. पर्वाची अखेर झाली.
ते अनेकांचे आयडॉल होते. मी तर म्हणेन तरुण वर्ग हा शेअर बाजाराकडे आकर्षित झाला तो त्यांच्यामुळेच. आपल्याला नेहमीच एक रोल मॉडेल हवा असतो. एक असा चेहरा जो आपल्याला आपलासा आपल्यातला वाटेल आणि मला वाटते भारताच्या शेअर बाजाराच्या इतिहासात तो मान फक्त राकेश झुनझुनवाला यांचाच राहील.