नवी दिल्ली : न्यायालयात जाऊन न्याय मिळतोच असे नाही, असे विधान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी केले आहे. सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत कायदा सांगायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच देशभरात कोट्यवधीहून अधिक खटले प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.
यशवंतराव चंद्रचूड स्मृती व्याख्यानमालेत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, जिल्हा न्यायालयांमध्ये चार कोटी, उच्च न्यायालयांमध्ये एक कोटीहून अधिक आणि सर्वोच्च न्यायालयात जवळपास ७२ हजार खटले प्रलंबित आहेत, त्यामुळे नेहमीच्या प्रक्रियेने हे सगळे खटले मार्गी लागणे अशक्य आहे. त्यामुळे न्यायालयात गेल्यावर न्याय मिळतोच असे नाही.
गेल्या काही वर्षांत वकिली क्षेत्राचे रूपांतर व्यवसायाकडून व्यापारात झाले आहे. न्यायदानाच्या क्षेत्रातील वकील, न्यायाधीश, न्यायमूर्ती, घटनातज्ज्ञ यांनी सामान्य माणसाला समजेल, अशा भाषेत कायदा सांगितला पाहिजे, असे मतही न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी व्यक्त केले आहे.