
मथुरा : श्रीकृष्ण जन्माष्टमीला जगप्रसिद्ध ठाकूर बांके बिहारी मंदिरात होणाऱ्या मंगला आरतीवेळी झालेल्या प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी होऊन झालेल्या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पहाटे दोन वाजता ही घटना घडली. वर्षातून एकदा होणाऱ्या मंगला आरतीसाठी हजारो भाविक मंदिर परिसरात दाखल झाले होते. त्यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाली.
मथुराचे एसएसपी अभिषेक यादव यांनी सांगितले की, मथुरेच्या वृंदावन बांके बिहारी मंदिरात मंगला आरतीवेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. गर्दीमुळे अचानक चेंगराचेंगरी झाली आणि एकच खळबळ उडाली. यामध्ये एका महिलेचा तर, एका पुरुष भाविकाचा मृत्यू झाला. तर, अनेक जण जखमी झाले असून, जखमी झालेल्या भाविकांना रामकृष्ण मिशन, ब्रज हेल्थ केअर आणि वृंदावन येथील सौ शैया रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
https://twitter.com/ani_digital/status/1560818454449438721
वृंदावनमध्ये जन्माष्टमीचा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासाठी भारतासह जगभरातील भाविक आणि पर्यटक येथे दाखल होत असतात. मात्र, जन्माष्टमीच्या दिवशी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे येथील हॉटेलमध्ये राहण्यास जागाही मिळत नाही. कालदेखील येथे आलेल्या भाविकांची संख्या अधिक होती. यामुळे अनेकांना फुटपाथवर झोपून रात्र काढावी लागली.
मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शहरातील गर्दी लक्षात घेता सणांच्या दिवशी मंदिरांसह ठिकठाकाणी अधिक कडक व्यवस्था करण्यात याव्यात जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळता येतील असे निर्देशही मुख्यमंत्री योगींनी गृह विभागाला दिले आहेत.