शालेय स्पर्धेत मूल भाग घेत नसेल, तर पालकांचा दबाब नसावा. संवाद साधा नि समजावून सांगा; स्पर्धेचे महत्त्व पाहता आनंदासाठी, आनंदाच्या क्षणाचे, प्रसंगाचे आपण धनी होऊ शकतो.
मृणालिनी कुलकर्णी
आपल्या मुलाचे होणारे कौतुक पालकांचा चेहरा उजळून टाकतो. गुरुपौर्णिमेपासून अभ्यासक्रमासोबत सुरू होणाऱ्या शाळेतील सहशालेय कार्यक्रमांना, स्पर्धांना सुरुवात होते. शालेय मुलांची संख्या पाहता, असंख्य विद्यार्थी स्पर्धेपासून, सहभागापासून दूरच राहतात. मला जमणार नाही, या विचाराने ते पुढे येतच नाहीत. मला जमू शकेल हे त्याला माहीतच नसते. हे चित्र बदलायला हवे.
काही ठिकाणी वर्षांच्या सुरुवातीच्याच दिवसांत इयत्तेप्रमाणे किंवा वर्गात गुणदर्शन सोहळा कार्यक्रम आखतात. तुला जे काही येते, ते तीन ते पाच मिनिटांत सादर कर. मुलांमध्येही ईर्ष्या जागृत होते. निसटती आवड जरी समजली तरी संवादातून मुलांशी पूल जोडायला मदत होते. अभ्यासाचा ताण कमी होतो.
प्रत्येक स्पर्धेचा माहोल वेगळा असतो. त्या माहोलात विद्यार्थ्यांचा सहभाग असावा. जसे स्पर्धेनुसार/विशेष दिनानुसार काचकपाटातील चित्रे, कात्रणे यशस्वी मुलांचे फोटो लावणे. प्रासंगिक माहिती देणारे फलक लेखन करणे, प्रेरणा मिळेल अशी आजची बातमी, गोष्ट सांगणे. रोजची निवडक वर्तमानपत्र, काही मासिके, मुलांनी वाचावी अशी पुस्तके दर्शनी भागात लावणे. कार्यक्रमाचे हार/गुलदस्ता करायला मुलांकडे सोपविणे. स्वसहभागामुळे मुलांमधील उत्साह वाढतो. कला, क्रीडा, विज्ञानामधील आंतरशालेय स्पर्धा होताना, त्या स्पर्धेत चिअर अप करताना होणारा आनंद तसेच स्नेहसंमेलनात रंगवेषभूषेसह व्यासपीठावर वावरताना, विज्ञान प्रकल्पात प्रयोग करता-करता स्पष्टीकरण देताना, मोठ्या चित्रकला स्पर्धेतील रंग रेषांच्या माहोलमध्ये रमताना, साहित्याशी संबंधित निबंध/वक्तृत्व स्पर्धा बोलताना, मुलांचे विश्व फॅन्सी ड्रेस/डान्स/गाणी या प्रत्येक स्पर्धेच्या माहोलमध्ये मुले खूश होतात आणि खूप काही शिकतात. थोर व्यक्तींचे दिनविशेष, सर्वधर्मीय आणि राष्ट्रीय सण साजरे करतानाचे विशेष सोहळे… या साऱ्यात विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष स्पर्धक म्हणून सहभाग किंवा सहकार्याच्या मदतीचा सहभाग दोन्हीही महत्त्वाचे असते. श्रेष्ठ कोण, कनिष्ठ कोण? यापेक्षा एकमेकांमध्ये चांगले शेअर करणे, पराभव खिलाडू वृत्तीने मान्य करणे, यशाचा सांघिक आनंद घेणे, हे सर्व अनुभव विद्यार्थ्यांना न दुखावता देताना, समजून सांगताना शिक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची असते.
बाहेरच्या जगातील विविध क्षेत्रातील स्पर्धा पाहता, साचेबंद स्पर्धांत व्यापक बदल झाला पाहिजे. नेहमीच्या ठरलेल्या मुलांऐवजी जास्तीत जास्त विद्यार्थी सहभाग घेतील, त्यातून न भाग घेणारे पुढे येतील, न बोलणाऱ्याकडे माईक द्या, मुलांचे आयुष्य बदलेल. माझ्या मुलाच्या शाळेत सर्वांसाठी निबंध स्पर्धा होत असे. यातून लिहिणारी मुले लक्षात आली. सर्वांसाठी धावण्याची स्पर्धा, प्रत्येकजण स्वतःची मर्यादा, प्रगती आजमावतो. आनंद घेणे व देणे ही भावना आयोजकांपासून सर्वांची हवी. आठवा, तारे जमींपर चित्रकला स्पर्धा.
विविध स्पर्धेत भाग घेण्यास पालकांचा विरोध असतो. ते म्हणतात,
१. शाळेचाच अभ्यास होत नाही आणखीन कसले अवांतर वाचन, वेगळ्या स्पर्धा?
२. प्रोजेक्ट/प्रकल्प यात मुलांचा किती वेळ फुकट जातो, शिवाय खर्च; परंतु मुलांच्या कल्पकतेला/सृजनतेला/विचाराला वाव देण्यासाठी प्रोजेक्ट असतात. येथे पाठ्यांश महत्त्वाचा असतो. डोंबिवलीच्या एका शाळेत ‘मानवाचे चंद्रावर पहिले पाऊल’ या कात्रण चित्रे चिकट वही स्पर्धेत, एका विद्यार्थ्याने रद्दीवाल्याकडे जाऊन वेगवेगळ्या वृत्तपत्रातून, मासिकातून कात्रणे/माहिती गोळा केली. स्वमेहनत आणि वेगळेपणामुळे प्रथम क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांचे नाव संदीप वासलेकर. संदीप वासलेकर म्हणतात, “प्रथम क्रमांकापेक्षा त्या दिवशी मला स्वतःची ओळख झाली.” आज ते जागतिक सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.
३. मुलाची इच्छा नसताना पालकांसाठी काही विद्यार्थी बालवैज्ञानिक किंवा तत्सम बाह्यपरीक्षेला बसवितात. त्यामुळे त्यांना परीक्षेचे गांभीर्य नसते. याच्याविरुद्ध आपल्या मुलासाठी काही पालक जातीने लक्ष घालतात.
४. विद्यार्थी नववीत जाताच साऱ्या स्पर्धा, मनोरंजन सहभागही बंद, यातून मुलाचे मन मारले जाते; मुले दबली जातात. वेगळाही परिणाम दिसून येतो. त्यापेक्षा मर्यादित सहभाग घेऊ द्यावा. मूल आपल्यापाशी राहते.
५. बाहेरील पैसा-प्रसिद्धीचे वलय पाहता, पालक आपल्या मुलाला तेथेच पाहतो. पालकांचा अतिसहभाग, अपेक्षा मुलांवर ताण निर्माण करतात. ‘आय आम दी बेस्ट’ हे बिंबवण्याऐवजी तू स्वतःच्या आनंदासाठी भाग घे, हे ठसविणे.
६. व्यावसायिक यश, नावलौकिक मिळताच काही मुलांचे आयुष्य बदलते. घरात/शाळेत मिळणारे अतिमहत्त्वाचे स्थान त्यातून वागणुकीत होणारा बदल (?) सावरता आला पाहिजे.
७. स्पर्धा निरोगी असावी, हे फक्त कागदावर लिहिण्यापुरते, वाचण्यापुरते, ऐकण्यापुरते अपवाद वगळता स्पर्धकांचा प्रत्यक्ष अनुभव प्रत्येक ठिकाणचा वेगळा असतो. उदा. बाह्य स्पर्धेत मिळणाऱ्या अनुभवावर त्याचा भविष्यकाळ अवलंबून असतो. चांगल्या अनुभवात, मिळणारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन भविष्यात करिअर बळकट करायला मदत होते. उत्साह वाढतो, प्रेरणा मिळते; परंतु एखाद्याला तीव्र कडवट शब्द ऐकावे लागतात, काही वेळा तो राजकारणाचा बळी ठरतो. बालमन कोलमडते. थोडा काळ प्रसिद्धीनंतर फेकले गेलेले खूप आहेत. या गर्तेतून मुलाला बाहेर काढून नवी उभारी देणं, हे ज्याचे त्याला (पालकांना) ठावे. म्हणून बाह्य स्पर्धा काहीजणांना तारते आणि काहीजणांना मारते.
शालेय स्पर्धेत मूल भाग घेत नसेल, तर पालकांचा दबाब नसावा. संवाद साधा नि समजावून सांगा; स्पर्धेचे महत्त्व पाहता आनंदासाठी, आनंदाच्या क्षणाचे, प्रसंगाचे आपण धनी होऊ शकतो. भविष्यात उत्तम जाणकार, परीक्षक, श्रोता, टीकाकार या भूमिकेत बसू शकतो. आपल्या मुलाला कमी लेखू नका, तुलना करू नका, त्याचा कालखंड नंतर येणार आहे. फक्त आपल्या मुलाला वेळ द्या. विश्वास ठेवा. मग मुलगाच म्हणेल, “पापा कहते है बडा नाम करेगा…”
नवी दिल्ली : आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल…
कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी लाभार्थींची कसरत! अर्ज करण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत, दोन अटी केल्या शिथिल…
बार्बाडोस : आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुमचे शब्द आणि पाठिंबा यासाठी तुमचे खूप खूप आभार.…
जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, वेतन व शैक्षणिक पात्रता मुंबई : तरुणांसाठी भरघोस पगारासह सरकारी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला मुंबई : 'विधीमंडळ लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे. या सभागृहाचा…
हाथरस : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली असून यामध्ये १२२ जणांचा…