Wednesday, May 14, 2025

महामुंबईताज्या घडामोडीराजकीय

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, एका समाजाचे कौतुक दुसऱ्या समाजाचा अपमान नसतो

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, एका समाजाचे कौतुक दुसऱ्या समाजाचा अपमान नसतो

मुंबईवरील वक्तव्यावर राज्यपालांचे स्पष्टीकरण


मुंबई : माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, एका समाजाचे कौतुक दुसऱ्या समाजाचा अपमान नसतो, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्टीकरण देत आपल्या वक्तव्याबाबत खूलासा केला आहे.


“मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला,” असे राज्यपाल म्हणाले. काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.


“पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो,” असे राज्यपालांनी नमूद केले. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे, असेही त्यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.


https://twitter.com/maha_governor/status/1553269558722822145

https://twitter.com/maha_governor/status/1553269566444535809

 
Comments
Add Comment