
मुंबई : “आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा हा तर एक बहाना आहे. पक्षात किती लोक उरले आहेत ते कदाचित तपासून पाहत आहेत आणि म्हणे मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही….. समय समय की बात है…..!”, असे ट्वीट करत मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेविरोधात खोचक टीका केली आहे. यासोबतच त्यांनी #संपलेलापक्ष हा हॅशटॅगही वापरला आहे.
https://twitter.com/ThakareShalini/status/1545615812869820416
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत आता ठिकठिकाणी मोठमोठे खिंडार पडत आहेत. आमदार, नगरसेवकांनतर आता खासदारांनीही बंडाचा पावित्रा घेतला आहे. यामुळे खडबडून जागे झालेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांचे पुत्र, युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील तळागाळातल्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
यानिमित्त आदित्य ठाकरे मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढत आहेत. या यात्रेद्वारे आदित्य ठाकरे बंडखोरांच्या मतदार संघात शक्तीप्रदर्शन करत आहेत. यावरूनच मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी टीका केली आहे.
आदित्य ठाकरेंच्या या यात्रेला कालपासून म्हणजेच ८ जुलैपासून सुरुवात झाली आहे. मात्र आज राष्ट्रीय दुखवटा असल्याने वरळीत होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे.