मुंबई : मागच्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूरमध्ये देखील पावसाचा जोर वाढत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे ४ ते ५ दिवस राज्यात सर्वदूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि इतर काही भागात अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाड, माणगाव, पनवेल, पेण, मुरुड तालुक्यातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. रायगड जिल्ह्यातील २६ गावातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. रायगड जिल्ह्यातील १ हजार ७१६ रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे.
तर कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी २५ फूट ८ इंचावर पोहोचली आहे. राजाराम बंधाराही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून धोकादायक मार्गावरून वाहतूक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.