मुंबई : अमरावती शहरातील मेडिकल व्यावसायिक उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची २१ जून रोजी रात्री हत्या झाली होती. कोल्हेंची हत्या ही उदयपूर पॅटर्न प्रमाणेच झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोशल मीडियावर नुपूर शर्मा यांच्या काही पोस्ट व्हायरल केल्यानेच ही हत्या झाल्याचे प्रथमदर्शी तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आता, थेट गृहमंत्री अमित शहा यांनीच ट्विट करुन या घटनेची दखल घेतल्याचे सांगितले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून अमरावतीतील कोल्हे खून प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचे सांगितले. या हत्याप्रकरणाचे कट-कारस्थान, हत्येच्या मागे असेलेल्या संघटना आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा तपास करण्यात येईल, असेही अमित शहा यांनी गृहमंत्रालयाच्या ट्विट अकाऊंटवरुन सांगितले आहे.
https://twitter.com/HMOIndia/status/1543160082514341889
गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) पथक व एटीएस अमरावती शहरात दाखल झाले असून ते या प्रकरणाशी संबंधित स्थानिक पोलिसांकडून माहिती घेत आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी यापूर्वीच पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. यानंतर आता पोलिसांनी सहाव्या आरोपीला देखील अटक केल्याची माहिती मिळत आहे.
यामध्ये मुदस्सीर अहमद उर्फ सोनू रजा वल्द शेख ईब्राहिम (२२), अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तसलीम (२४), शाहरूख पठाण उर्फ बादशाह हिदायत खान (२५), शोएब खान उर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (२२), अतिब रशीद वल्द आदील रशीद (२२), युसूफ खान बहादूर खान (४४) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना कोर्टाने ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.