मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील स्कूल बस नियमावलीची सक्ती तातडीने करण्यासंदर्भातील सूचना अप्पर पोलीस महासंचालकांनी परिवहन विभागाला दिल्या आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या विनंती पत्रानंतर, स्कूल बसची नियमावली कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईतील पोदार शाळेतील विद्यार्थी शाळा सुटून पाच तास झाले, तरी घरी न पोहोचल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सांताक्रुझमधील पोदार शाळेची ही बस होती. शाळा सुटल्यानंतर, ही बस विद्यार्थ्यांना घेऊन घरच्या दिशेने निघाली, पण पाच तासांनंतरही विद्यार्थी घरी पोहोचले नाहीत. त्यामुळे पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पंधरा दिवसांमध्ये नवे शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये सुरु असलेल्या बस सेवांमध्ये अनेक त्रुटी असल्याचे दिसून येत आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन भविष्यात असे प्रसंग उद्धवू नये, म्हणून बसमध्ये जीपीआरएस बसवणे स्कूल बस मालकांना बंधनकारक असणार आहे. यासोबतच बस चालक आणि मदतनिसांची पोलीस पडताळणी बंधनकारक असेल.