मुंबई (प्रतिनिधी) : यशस्वी जयस्वालची धडाकेबाज सलामी आणि अनुभवी रविचंद्रन अश्वीनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे शुक्रवारी राजस्थानने चेन्नईवर मात करत ‘प्ले-ऑफ’ मध्ये दिमाखात प्रवेश केला. ओबेद मॅकॉय, युजवेंद्र चहल यांची धावा रोखणारी आणि बळी मिळवणारी गोलंदाजीही राजस्थानच्या विजयात मोलाची ठरली. २० षटकांत १५१ धावांचे लक्ष्य राजस्थानसाठी मोठे नसले तरी त्याचा पाठलाग करताना राजस्थानचा दम निघाला.
जयस्वाल धावा जमविण्यात यशस्वी ठरला असला तरी जोस बटलर, देवदत्त पडिक्कल आणि संजू सॅमसन यांच्या अपयशाने राजस्थानची डोकेदुखी वाढवली. जयस्वालने संघातर्फे सर्वाधिक ५९ धावांचे योगदान दिले. दरम्यान शेमरॉन हेटमायरनेही नाराज केल्याने राजस्थानच्या अडचणीत आणखी वाढ झाली. तळात रविचंद्रन अश्वीनने अनुभव पणाला लावत संघाला आवश्यक असलेली खेळी खेळली. मोक्याच्या क्षणी अश्वीनची खेळी संघाच्या विजयात निर्णायक ठरली. अश्वीनने ४० धावा ठोकत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. १५१ धावांचे लक्ष्य राजस्थानने १९.४ षटकांत पूर्ण केले. ५ विकेट राखून राजस्थानने हा सामना खिशात घातला.
नाणेफेकीचा कौल जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रुतुराज गायकवाड आणि देवॉन कॉनवे या सलामीवीरांनी नाराज केल्यानंतर मोईन अलीने फलंदाजीची सूत्रे हाती घेत राजस्थानच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. दुसऱ्या फलंदाजाकडून साथ मिळाली नसली तरी मोईनने एका बाजूने धावांचा ओघ कायम ठेवला. त्यामुळे दोन फलंदाजांमध्ये भागीदारी झाली नसली तरी चेन्नईचे धावफलक खेळते राहीले. मोईन अलीने ५७ चेंडूंत ९३ धावांची उपयुक्त खेळी खेळली. त्याला धोनीने बरी साथ दिली.
धोनीने २८ चेंडूंत २९ धावांचे योगदान दिले. चेन्नईने २० षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात १५० धावांपर्यंत मजल मारली. मोईन अली आणि धोनी वगळता चेन्नईचे अन्य फलंदाज राजस्थानच्या सापळ्यात झटपट अडकले. ओबेद मॅकॉय, युजवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्वीन या गोलंदाजांच्या तिकडीने चेन्नईचा कणाच मोडला. त्यांनी धावा रोखण्यात आणि बळी मिळवण्यातही यश मिळवले. त्यामुळे चेन्नईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.