पुणे (वृत्तसंस्था) : अभिषेक शर्मा आणि मारक्रम वगळता अन्य फलंदाजांना आलेले अपयश शनिवारी हैदराबादच्या पराभवाचे कारण ठरले. या सामन्यातील पराभवामुळे हैदराबादच्या पराभवांचा पंच (सलग पाच सामने गमाविले) झाला आहे. तसेच कोलकाताविरुद्धच्या पराभवामुळे हैदराबादची ‘प्ले-ऑफ’ प्रवेशाची अडचणही वाढली आहे. दरम्यान कोलकाताच्या विजयाने ‘प्ले-ऑफ’मधील रंगत वाढली आहे.
कोलकाताच्या १७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या हैदराबादच्या फलंदाजांना पार्टनरशीप करण्यात अपयश आले. त्यांची कोणतीच जोडी मैदानात थांबली नाही. त्यांच्या अभिषेक शर्मा आणि मारक्रम यांनी प्रत्युत्तर करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अन्य फलंदाजांनी साथ दिली नाही. अभिषेकने ४३ धावांचे योगदान दिले, तर मारक्रमने ३२ धावा केल्या. या दोघांना वगळता त्यांचे अन्य फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. केन विल्यमसन, राहुल त्रिपाठी, निकोलस पुरन या भरवशाच्या फलंदाजांनी नाराज केले. त्यामुळे हैदराबादला २० षटकांत १२३ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे कोलकाताने ५४ धावांनी सामना खिशात घातला.
कोलकाताने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांना चांगली सुरुवात करता आली नसली तरी खेळाडूंच्या सांघिक फलंदाजीमुळे त्यांना २० षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात १७७ धावांपर्यंत मजल मारता आली. आंद्रे रसलने तुफानी फलंदाजी करत २८ चेंडूंत नाबाद ४९ धावा केल्या. त्यामुळे संघाला शेवटच्या षटकांत धावांचा वेग वाढवता आला.
सॅम बिलींग्स (३४ धावा), अजिंक्य रहाणे (२८ धावा) आणि नितीश राणा (२६ धावा) यांनी केलेल्या सांघिक फलंदाजीमुळे कोलकाताने १७७ धावा केल्या. हैदराबादचे उम्रान मलिक, भुवनेश्वर कुमार आणि मार्को जानसेन यांनी लक्षवेधी गोलंदाजी केली. मलिकने ४ षटकांत ३३ धावा देत ३ बळी मिळवले. भुवनेश्वर, मार्कोने प्रत्येकी १ बळी मिळवला.