सफाळे (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यात अनेकानेक वर्षांपासून हत्तीरोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये राबविण्यात आलेल्या संक्रमण पडताळणी सर्वेक्षण मोहिमेत ६ ते ७ वर्ष वयोगटातील निवडक लहान मुलांच्या तपासणीत डहाणू, विक्रमगड, तलासरी तालुक्यात सर्वाधिक २९ बालके संक्रमित (हत्तीरोग दूषित) आढळून आली. २०१६ ते २०२२ या कालावधीतील विविध सर्वेक्षणात या तीन तालुक्यात १४७ व्यक्ती हत्तीरोग संक्रमित आढळून आल्या आहेत.
त्यासाठी तीन तालुक्यात २५ मे ते ५ जून या कालावधीत “सामुदायिक औषधोपचार मोहीम” राबविण्यात येणार आहे. बालकांचे भवितव्य हत्तीरोगमुक्त ठेवण्यासाठी मुले, प्रौढ व्यक्ती व वयोवृद्ध या सर्वांनी हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचे प्रत्यक्ष सेवन करणे आवश्यक असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सागर पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील सभेत सांगितले. यावेळी जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
डहाणू, तलासरी व विक्रमगडमध्ये प्रादुर्भाव अधिक असल्याने या तालुक्यात पुढील दोन वर्ष सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसाळ यांनी आवश्यक जनजागृतीसाठी सर्व यंत्रणांना सूचना दिल्या असून २५ मे पासून सामुदायिक औषधोपचार मोहिमेल डहाणू, तलासरी व विक्रमगड तालुक्यातील नागरिकांना हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समक्ष खाण्याचे आवाहन केले आहे.
हा आजार क्युलेक्स प्रजातीच्या डासांमार्फत होतो. सेप्टिक टँक, घाण, निचऱ्याच्या जागी व गटारे अशा दूषित पाण्याच्या जागी या डासांची पैदास होते. हातापायाला सूज किंवा हत्तीपायसारख्या विकृती डास चावल्यानंतर सूक्ष्मजीव शरीरात प्रवेश झाल्यानंतर ५ ते १० वर्षांनंतर निर्माण होत असल्याने सुरुवातीच्या काळात व्यक्ती याबाबत अनभिज्ञ राहतात.