सिंधुदुर्ग : राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये १ जून ते ३१ जुलै २०२२ या कालावधीमध्ये मासेमारी करण्यास बंदी लागू करण्यात आल्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने दिले आहेत.
या आदेशात म्हटले आहे की, मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांची जीवित व वित्त यांचे रक्षण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ च्या कलम ४ च्या पोट कलम १ द्वारे प्राप्त अधिकारांचा वापर करून दि. १ जून ते ३१ जुलै (दोन्ही दिवस धरून) राज्याच्या जलधी क्षेत्रात मासेमारी नौंकास पावसाळी मासेमारी बंदी घालण्यात आलेली आहे.
याकालावधीत मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. तसेच या कालावधीत खराब/वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारांची जीवित व वित्त हानी टाळता येणे शक्य होते. त्यामुळे या कालावधीत यांत्रिक मासेमारी नौंकास मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. ही पावसाळी मासेमारी बंदी यांत्रित मासेमारी नौकांना लागू राहील. पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापुढे) खोल समुद्रात यांत्रिक नौकांस पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास, केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) २०२१ च्या कलम १४ अन्वये नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल. तसेच कलम १७ मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल. पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडुन कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. बंदी कालावधीमध्ये राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकास अवागमन निषिद्ध आहे.