गौसखान पठाण
सुधागड – पाली : उन्हाचा तडाखा सर्वत्रच वाढला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चाऱ्याचाही अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्नपाण्याची कमतरता भासू लागली आहे. मग ही मोकाट गुरे पालीमध्ये असलेल्या कचराकुंड्या व उकिरड्यावर जाऊन मिळेल ते खात आहेत. तसेच भटके कुत्रेही उकिरड्यावर येतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय, कचऱ्याची समस्या गंभीर होऊन स्वच्छतेचा प्रश्नसुद्धा ऐरणीवर आला आहे.
येथील जुने पोलीस स्थानक, कुंभारआळी, बाजारपेठ, मधली आळी, बल्लाळेश्वर मंदिर, महाकाली मंदिर परिसर, मिनिडोअर स्टॅन्ड, भोईआळी, आगर आळी या ठिकाणी कचरा कुंड्यांवर सकाळपासूनच मोकाट गुरांची गर्दी असते. येथे टाकलेला कचरा ही गुरे अस्ताव्यस्त करतात. त्यामुळे येथे घाण व दुर्गंधी पसरते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येते. बऱ्याचवेळा टाकून दिलेले अन्नपदार्थ पिशव्यांमध्ये असते. परिणामी गुरांच्या पोटात कमी अधिक प्रमाणात प्लास्टिक जाते. प्लास्टिक व सडके आणि कुजलेले अन्न पदार्थ खाऊन या जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. त्यांची पचनशक्ती मंदावते.
अन्नाच्या शोधात सतत चालल्याने त्यांची ऊर्जा कमी होते. अशक्तपणा येतो. कचराकुंड्यांमध्ये व उकिरड्यावरील कचऱ्यात धातू तसेच अणुकुचीदार वस्तू उदा. घरगुती वापराची सुई, इंजेक्शनच्या सुया आदी घटक असतात. त्या पोटात गेल्यामुळे जनावरांच्या जठराला व अन्ननलिकेला इजा पोहचते. सतत प्लास्टिक खाल्ल्यामुळे ते त्यांच्या पोटात साठते. त्यामुळे गुरे मरतात. काही वेळेस अशा मेलेल्या गुरांची हाडे इतर गुरे आणि प्राणी चघळतात व पर्यायाने त्यामुळे त्यांचादेखील मृत्यू होतो. हे दुष्टचक्र असेच सुरूच राहते.
उष्म्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरी किंवा गुरेपालक आपली गुरे चरण्यासाठी मोकाट सोडून देतात. शासनाने मोकाट गुरांच्या चारा पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. किंवा पशुपालकांना यासाठी अनुदान दिले पाहिजे. नागरिकांनी कचराकुंड्यांमध्ये कचरा न टाकता घंटागाडीतच कचरा टाकावा. जेणेकरून गुरे तेथे येणार नाहीत. – आरिफ मणियार, उपनगराध्यक्ष, पाली, नगरपंचायत
भारतात सुक्यापेक्षा ओला कचराच जास्त असतो. ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट केल्यास त्याचा पर्यावरणाला फायदा होऊ शकतो. प्रशासनाला वाटत असेल तर पाली शहरातील कचरा समस्या सोडवणे अशक्य आहे. नागरिकांमध्ये ओला कचरा, सुका कचरा विलिगीकरणाबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. – दत्तात्रय दळवी, स्वयंपूर्ण सुधागड
शेतकऱ्यांनी व पशुपालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नये. त्यांना पेंढा किंवा सुके गवत खाऊ घालावे. कचऱ्यात किंवा उकिरड्यावर टाकलेले अन्नपदार्थ खाऊन गुरांची पचनक्रिया बिघडते. मानवी खाद्य जनावरांसाठी नाही. वारंवार प्लास्टिक पोटात गेल्याने ते पोटात साठून गुरांचा मृत्यू होऊ शकतो. – डॉ. प्रशांत कोकरे, तालुका पशुधन विकास अधिकारी, सुधागड
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…