मुंबई : मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान दिलेल्या नवनीत राणा आणि रवी राणा यांचे निवासस्थान असलेल्या खारमधील इमारतीला शिवसैनिकांनी वेढा घातला आहे. शिवसैनिकांनी या परिसरात पोलिसांनी लावलेले बॅरिकेडस तोडून थेट राणा दाम्पत्याच्या इमारतीपर्यंत मजल मजल मारली. यानंतर राणा दाम्पत्यही आक्रमक झाले आहे. नवनीत राणा आणि रवी राणा या एक दोघांनीही व्हीडिओ प्रसिद्ध करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे म्हणजे बिनकामी पूर्ण पगारी मुख्यमंत्री असल्याचे वक्तव्य नवनीत राणा यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता शिवसेना आणखीनच आक्रमक होण्याची शक्यता आहे.
पोलिसांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दबाव आणला जात असल्याचा आरोपही नवनीत राणा यांनी केला. गेली दोन वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले नाहीत. पण काल ते मातोश्री परिसरात शिवसैनिकांना भेटले. त्यानंतर मातोश्रीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठकही झाली. याच बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आमच्या घरावर हल्ला करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री हे सध्या फक्त कोणाला आत टाकायचे, कोणावर कोणती केस करायची, हेच काम करत आहेत. कालपासून आमच्या इमारतीच्या परिसरात असलेल्या बॅरिकेटसला कोणीही टचही केले नव्हते. मग आज शिवसैनिक बॅरिकेटस तोडून आतमध्ये कसे काय शिरले, असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला.
तरीही आम्ही मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्यावर ठाम आहोत. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही पूर्वजांच्या जिवावर जगत असाल. पण आम्ही इथपर्यंत स्वत:च्या ताकदीवर आलो आहोत. मी आता घराबाहेरही पडणार आहे. मातोश्रीवर जाईन. यानंतर कायदा-सुव्यवस्था बिघडली तर त्याची जबाबदारी ही सरकारची असेल, असेही नवनीत राणा यांनी म्हटले.