नागपुर (प्रतिनिधी) : दारिद्र्यरेषेखालील दाम्पत्याला एकच अपत्य असेल तर अशा कुटुंबाला महाविकास आघाडी सरकारने वाढीव शासकीय मदत करावी, शिवाय त्यांच्या शासकीय योजनांच्या लाभामध्ये वाढ करावी, अशी मागणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.
नितीन राऊत यांनी लिहिलेल्या ‘आंबेडकर ऑन पॉप्युलेशन पॉलिसी, काँटेंप्रेरी रिलिवेंस’ या पुस्तक प्रकाशन रविवारी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते नागपुरात झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाइन उपस्थित होते.
देशाची वाढती लोकसंख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाला आणि प्रशासनाला निर्देश द्यावे आणि कुटुंब एका अपत्यापर्यंत मर्यादित ठेवणाऱ्या अल्प उत्पन्न असलेल्या किंवा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना वाढीव मदत करावी, ही मागणी राऊत यांनी यावेळी केली.