Saturday, June 29, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणराजापुरातील रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे!

राजापुरातील रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे!

राजापूर (प्रतिनिधी) : तालुक्यात नव्याने प्रस्तावित असलेल्या धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरातील रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ रविवारी राजापुरात आयोजित करण्यात आलेल्या समर्थन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, असा एकमुखी निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. तसा सर्वपक्षीय एकमुखी ठराव पारित करून शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करण्याचा संकल्प या मेळाव्यात सोडण्यात आला. राजापूर तालुक्यात धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरात प्रस्तावित असलेल्या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा होऊन या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, हा समर्थकांचा आवाज शासनापर्यंत अधिक जोमाने पोहोचविण्यासाठी रिफायनरी प्रकल्प समन्वय समिती राजापूरच्या वतीने राजापूर शहरातील यशोदिन सृष्टी सभागृहात प्रकल्प समर्थकांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सर्वपक्षीय समर्थन मेळाव्यात धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरातील स्थानिक जनतेबरोबरच राजापूर तालुक्याच्या पूर्व भागापासून पश्चिम किनारपट्टीपर्यंत पसरलेल्या सर्व गावांतील रिफायनरी समर्थकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती. दुपारी दोन वाजल्यापासून प्रकल्प समर्थन मेळावास्थळी समर्थकांनी गर्दी केली होती. तर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेच्या अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहत समर्थन करत धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, असा नारा दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -