आई कुठे काय करते? हा सध्या एक राष्ट्रीय प्रश्न बनला आहे. स्टार प्रवाह चॅनेलवर सुरू असलेल्या ‘आई कुठे काय करते!’ शीर्षकाखालील टीव्ही मालिकेद्वारे या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या सीरियलमधील अरुंधती अनिरुद्ध देशमुख ही भूमिका घराघरात पोहोचली आहे. हा रोल प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर साकारत आहे. प्रत्येक स्त्री अरुंधतीमध्ये स्वत:ला पाहते, हीच माझ्या सक्षम अभिनयाची मोठी पावती आहे, असे मधुराणी यांनी म्हटले आहे.
अरुंधती कॅरेक्टर इतके प्रभावी ठरेल, असे वाटले होते का?
अनेक वर्षे मी मालिकांपासून दूर होते. मात्र, माझ्याकडे मालिकांच्या अनेक ऑफर्स येत होत्या. मात्र, ते विषय पटणारे नव्हते. दरम्यान, प्रोजेक्ट हेड अमिता नाडकर्णी आणि रवींद्र करमरकर यांनी मालिकेची कथा सांगितली तेव्हा मला उमगले की, ही एका सर्वसामान्य गृहिणीचा हा प्रवास आहे. तिच्या आत्मभानाचा, टोकापर्यंतचा तसेच स्वत:च्या पायावर समर्थपणे उभी राहण्याचा प्रवास आहे. आजवर अनेक मालिकांमध्ये स्त्रीला त्यागमूर्ती दाखवण्यात आले आहे. घरातील प्रत्येकाचा अन्याय सहन करणारी (सोशिक) तसेच दुसऱ्याच्या आनंदासाठी सुखासाठी आपले म्हणणे मनातच ठेवणारी स्त्री मी सुद्धा साकारली आहे. अरुंधतीची भूमिका माझ्यापेक्षा मोठ्या वयाची आहे. मात्र, ही सशक्त भूमिका आहे. तिला एक ग्राफ आहे. त्यामुळे मी होकार दिला. मात्र, माझे कॅरेक्टर आणि मालिका इतकी प्रसिद्ध होईल. तसेच अरुंधती ही प्रत्येक स्त्रीला आपली वाटेल. तसेच प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करेल, असे वाटले नव्हते. मालिकेसह माझी भूमिका प्रत्येकाच्या पसंतीला उतरली आहे. याचा खूप आनंद आहे. चाहत्यांच्या, प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे प्रेमामुळे मला आणखी चांगले काम करण्याची उर्जा मिळते.
अरुंधती सक्षमपणे साकारण्याठी काय मेहनत घेत आहात?
एखाद्या भूमिकेत स्वत:ला ओतून घेतले की, रिझल्ट चांगलाच मिळतो. मी अरुंधती केवळ साकारत नाही तर जगत आहे. मी एक स्त्री आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हा प्रवास पाहिलेला असतो. अनुभवलेला असतो. अरुंधती कॅरेक्टर चांगल्या पद्धतीने लिहिले जात आहे. त्यानंतर आमचे दिग्दर्शक तसे काम आमच्याकडून करवून घेतात. त्यामुळे कॅरेक्टरला जुळवून घेण्यास अधिक मदत होते. त्यातच कविता किंवा अन्य साहित्याचे केलेले आजवरचे वाचन तसेच यापूर्वीचा चित्रपट, टीव्ही मालिकांचा अनुभव मला भूमिका चांगल्याप्रकारे साकारण्यासाठी मोलाचे ठरतेय.
गाण्याची आवड पुन्हा जोपासण्याचा अरुंधतीचा निर्णय आणि तुमच्यात काही साम्य आहे का?
अरुंधतीला गाण्याची आवड आहे, इतकेच मला सुरुवातीला ठाऊक होते. मात्र, मालिकेचा ट्रॅक बदलताना माझ्या गोड गळयाचा वापर कथेमध्ये इतक्या उत्कट पद्धतीने सादर होईल, असे वाटले नव्हते. अनेक सीनमध्ये मी स्वत: गाणे गाते. मला गायनाची पार्श्वभूमी आहे. माझी आई आणि मी गायिका आहोत. आईचा शास्त्रीय संगीतातील अभ्यास आहे. त्यामुळे अरुंधतीचा गायिका बनण्याचा प्रवास मी अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकते.
इथवरच्या कारकीर्दीबद्दल काय सांगाल?
माझा जन्म भुसावळचा असला तरी बालपण तसेच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात गेले. सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या पुण्यात लहानाची मोठी झाल्याचा खूप फायदा झाला. आई कलाक्षेत्रात असल्यामुळे माझे चित्रपट, मालिका क्षेत्र जवळून पाहिले होते. कुटुंबासह शाळा, कॉलेजमध्ये प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे आज सर्वोत्तम काम करत असल्याचे सर्व श्रेय पुण्याला जाते. मुंबईत आल्यानंतर मी अनेक जाहिरातींमध्ये काम केले. काही चित्रपट केले. दरम्यान, मुलीसाठी थोडा ब्रेक घेतला. त्यामुळे जवळपास दहा वर्षे चित्रपट आणि मालिका क्षेत्रापासून दूर होते. मात्र, ‘आई कुठे काय करते!’ या मालिकेच्या निमित्ताने मला दमदार पुनरागमनाची संधी मिळाली.
प्रत्येक स्त्री कॅरेक्टरमध्ये स्वत:ला पाहते.
चाहत्यांचे प्रेम कल्पनेच्या पलीकडील आहे. प्रेक्षक केवळ प्रेम करत नाहीत तर प्रत्येक स्त्री अरुंधतीमध्ये स्वत:ला पाहते. आजवरच्या मालिका, चित्रपटांमधील भावनिक प्रसंगानंतर प्रत्येक स्त्रीला अ श्रू अनावर होतात. मात्र, अरुंधतीला पाहून अनेकांना नवे काही करण्याची प्रेरणा मिळाली आहे. असंख्य स्त्रिया मला भेटतात. प्रत्येक स्त्रीला स्वत:चे अस्तित्व निर्माण करायचे असते. परंतु, प्रत्येकीचा प्रवास वेगवगळा असतो. मला भेटल्यानंतर अनेकींना भरून येते. मात्र, त्या रडत नाहीत. अरुंधतीच्या माध्यमातून त्यांना स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याची, सक्षमपणे जगण्याचे बळ मिळाले आहे. हे मला खूप भावते. मी जिंकले, असे मला तेव्हा वाटते. अरुंधतीच्या भूमिकेचे प्रभावी स्क्रिप्ट, दिग्दर्शकांचे कौशल्यपूर्ण सादरीकरण तसेच आणि मी ज्याप्रमाणे कॅरेक्टर वठवते आहे, त्यातून लाखो स्त्रियांना प्रेरणा मिळतेय. त्यांच्यात निर्णयक्षमता निर्माण होतेय आणि सबलपणे आपापल्या वाटेकडे एक पाऊल पुढे टाकण्याची शक्ती मिळतेय, ही माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…
डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…
CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…
मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Pehalgam Terror Attack) जगभरात एकच खळबळ…
पटना : बिहारमधील एका नीटची (NEET) परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक…