नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील नागरिक आणि मतदारांना विशेष आवाहन केले आहे.
ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या भागासाठी सर्व मतदारांना माझा आग्रह आहे की, कोविड नियम पाळत लोकशाहीच्या या पर्वात उत्साहाने भाग घ्या. लक्षात ठेवा, पहले मतदान, फिर जलपान!”
उत्तर प्रदेश विधानसभा चुनाव में आज पहले चरण की वोटिंग है। सभी मतदाताओं से मेरा आग्रह है कि वे कोविड नियमों का पालन करते हुए लोकतंत्र के इस पावन पर्व में बढ़-चढ़कर हिस्सा लें। याद रखना है- पहले मतदान, फिर जलपान!
— Narendra Modi (@narendramodi) February 10, 2022
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. राज्याच्या पश्चिम भागाच्या ११ जिल्ह्यांतील ५८ मतदारसंघात मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक तत्त्वे राबवण्यात आली आहेत.
उत्तर प्रदेश सरकारमधील श्रीकांत शर्मा, सुरेश राणा, संदीप सिंह, कपिलदेव अगरवाल, अतुल गर्ग आणि चौधरी लक्ष्मी नारायण हे मंत्री पहिल्या टप्प्यात प्रमुख उमेदवार आहेत. या ५८ मतदारसंघात एकूण ६२३ उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत असून दोन कोटी २७ लाख मतदार आहेत. जाट मतदारांचा प्राबल्य असलेल्या या भागांत मतदान होणार असून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना या भागांतील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे यंदा भाजपला या मतदारसंघात कसा प्रतिसाद मिळतोय याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.