मुंबई : थोबाड फुटले… आमच्याकडे बहुमत आहे या गुर्मीत भाजपच्या १२ आमदारांचे १ वर्षासाठी केलेले निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. राज्य सरकार पुन्हा एकदा तोंडावर सणसणीत आपटले, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दिली आहे.
ते म्हणाले, हा निर्णय महाभकास आघाडी सरकारचा थोबाड फोडणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी (ता.२८) भाजपचे १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात १२ आमदारांनी गैरवर्तन केल्याबद्दल तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी वर्षभरासाठी निलंबन केले होते. त्या निलंबनाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
त्याचा निर्णय आज न्यायालयाने दिला आहे. भातखळकर म्हणाले, केवळ आम्ही सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून बेकायदेशीर पद्धतीने निलंबित करण्यात आले. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मोडून काढला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आणि मतदारसंघातील जनतेचे आभार मानतो.