Thursday, April 24, 2025
Homeदेशकोरोना रुग्णांच्या डिस्चार्जबाबत नवे धोरण

कोरोना रुग्णांच्या डिस्चार्जबाबत नवे धोरण

तीन दिवस ताप नसेल तर आपोआप डिस्चार्ज

नवी दिल्ली: करोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत असलेल्या धोरणात केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार आता केवळ तीन दिवसांतच रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे. याबाबत आज केंद्रीय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. केंद्रीय आरोग्य विभागाने बुधवारी देशातील कोविड स्थितीबाबत पत्रकार परिषदेत तपशील दिला. यावेळी कोविड बाबत सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयांची माहितीही देण्यात आली. कोविडची सध्या जी स्थिती आहे त्याचा आढावा घेण्यात आला. त्यातून रुग्णांची तीन प्रकारांत विभागणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

सौम्य, मध्यम आणि गंभीर असे हे तीन प्रकार असतील. त्याचवेळी करोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबतचेही धोरण बदलण्यात येत आहे. त्यानुसार करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सलग तीन दिवस ताप नसेल तर रुग्णाला डिस्चार्ज मिळाला असे मानले जाईल. त्यानंतर पुन्हा कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता असणार नाही, असे अगरवाल यांनी नमूद केले. मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णालाही तीन दिवस ताप आला नाही आणि ऑक्सीजन सपोर्टशिवाय त्याची ऑक्सीजन सॅच्युरेशन लेवल ९३ टक्केपेक्षा जास्त असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने डिस्चार्ज देता येईल. या रुग्णाचीही पुन्हा करोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही. रुग्णालय व होम आयसोलेशन अशा दोन्हींसाठी हा नियम असेल, असेही स्पष्ट करण्यात आले. गंभीर रुग्णाला सतत ऑक्सीजनची गरज भासत असेल. त्याची ऑक्सीजन सॅच्युरेशन लेवल अपेक्षित नसेल तर उपचारांमध्ये खंड पडू देऊ नये. यात सुधारणा झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने डिस्चार्ज देता येईल, असेही नमूद करण्यात आले.

ऑक्सिजनचा पुरेसा साठा ठेवा…

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतान केंद्र सरकारने राज्यांना सतर्क केले आहे. केंद्र सरकारने राज्यांना पुन्हा पत्र लिहिले आहे. राज्यांनी आपल्याकडे ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, अशी सूचना केंद्राने केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. पुरेसा मेडिकल ऑक्सिजन उपलब्ध राहील, याची काळजी घ्यावी. त्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी सूचना त्यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना केली आहे. रुग्णांची काळजी घेणाऱ्या सर्व आरोग्य सुविधा सज्ज ठेवा आणि किमान ४८ तास वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरेसा बफर स्टॉक उपलब्ध ठेवा.सर्व आरोग्य सुविधांमध्ये लिक्वीड वैद्यकीय ऑक्सिजन टाक्या पुरेशा प्रमाणात भरलेल्या हव्यात, असे पत्रात म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -