Monday, June 30, 2025

तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपाला हरवून दाखवावे

तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपाला हरवून दाखवावे

पुणे : “हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपाला हरवून दाखवावं” असे खुले आव्हान भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीला दिले.


पुणे ही लोकमान्य टिळकांची नगरी आहे. लोकमान्यांनी स्वराज्य माझा जन्म सिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना केली होती. मात्र, शिवसेना सत्ता हा माझा अधिकार आहे आणि कोणत्याही प्रकारे मिळवणार असे म्हणत आहे, अशी टीका करतानाच हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात या. आम्ही तुमच्याशी दोन हात करायला तयार आहोत, असे आव्हान अमित शहा यांनी दिले.


पुण्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी बोलताना अमित शहा म्हणाले की, राज्यातील आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांचं ऑटोरिक्षावालं सरकार आहे. या सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर झालेले आहेत. ते चालत नाही. फक्त धूर सोडतं आणि प्रदूषण करतं, अशी टीका करतानाच महाराष्ट्रातील जनतेच्या घराघरात जा. हे सरकार महाराष्ट्राचं कल्याण करू शकते का? असा सवाल करा. देशाचं नेतृत्व या महाराष्ट्राने केलं. सर्व गोष्टीत महाराष्ट्र आघाडीवर होता. कृषीपासून ते सर्व क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर होता. हे लोक महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देऊ शकतात का? हे निकम्मे सरकार आहे. या सरकारच्या पतनाची सुरुवात पुणे महापालिकेच्या निकालाने झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

Comments
Add Comment