Wednesday, April 23, 2025
Homeअध्यात्मस्वामी समर्थांचे खंडोबा मंदिर

स्वामी समर्थांचे खंडोबा मंदिर

सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वीचा काळ असेल. निर्गुण निराकार परब्रह्माचे सगुण साकार रूप स्वामी समर्थांच्या रूपाने अक्कलकोटात प्रथम अवतरले. त्या खंडोबा मंदिराची कथा अशी सांगितली जाते – अक्कलक्कोट संस्थानचे अधिपती कै. श्रीमंत शहाजीराजे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई राणीसाहेब या अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्या नेहमी पंढरपूर, तुळजापूर व जेजुरी आदी तीर्थक्षेत्राच्या वाऱ्या करीत असत. त्यातल्या त्यात त्यांची जेजुरीच्या खंडेरायावर विशेष श्रद्धा होती. एकदा त्यांच्या मनात आले की, श्री खंडेरायाचे दर्शन आपणाला सदैव व सहज व्हावे, म्हणून अक्कलकोट येथेच एक श्री खंडेरायाचे मंदिर बांधावे. त्याप्रमाणे एकदा जेजुरीवरून येताना त्यांनी श्री खंडेराया, श्री म्हाळसा व श्री बाणाबाई अशा तीन मूर्ती बरोबर आणल्या. अक्कलकोट येथे निसर्गरम्य अशा ठिकाणी हे सध्याचे छोटेसे मंदिर बांधून मूर्तीची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा केली. लक्ष्मीबाई राणीसाहेब यांनी जेजुरीहून येताना खंडेरायाच्या मूर्तीबरोबर एक छोटा घोडाही आणला होता. मार्गशीर्ष महिन्यातील रविवार व चंपाषष्ठीला तो घोडा मंदिरात आणला जाई. पुढे काही वर्षांनंतर तो घोडा मरण पावल्यानंतर त्यांचा अंत्यविधी या खंडोबा मंदिरासमोर करण्यात येऊन तेथेच त्याची समाधीही बांधण्यात आली. ती आजही चांगल्या स्थितीत आहे. मध्यंतरी कैलासवासी श्रीमंत ताराबाई राणीसाहेब यांच्या कारकिर्दीत मंदिराच्या चारही बाजूस पत्रे व कट्टा बांधून मंदिर बरेच वाढविण्यात आले. सध्या मंदिर चांगल्या स्थितीत असून थोडीफार सुधारणाही झाली आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते चंपाषष्ठीपर्यंत नवरात्र महोत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो. ज्यांना अक्कलकोट क्षेत्राची नीट माहिती आहे, ते इथे जातातच. निर्गुण निराकार परब्रह्माचे सगुण साकार रूप अक्कलकोटात प्रथम अवतरले ते इथेच.

त्यामुळे या स्थानाचे माहात्म्य आगळे आहे.

स्वामी म्हणे राहा सदा उत्साही
प्रसन्न आई, ताई, बारामाही ।। १।।
राहा सदा नि सदा साहसी
आनंदी राहाल बारामासी ।। २।।
राहा सदा ठेवून श्रद्धा धीर
माराल शत्रूवर बिनचूक तीर ।। ३।।
वापरा सदा अभ्यासून बुद्धी
नाहीशी होईल शत्रूची कुबुद्धी ।। ४।।
व्यायाम करूनी वाढवा शक्ती
वाढेल मस्तिष्काची शक्ती ।। ५।।
नेहमीच गाजवा तुमचा पराक्रम
करा आयुष्यभर नवीन विक्रम ।।६।।
ही बाळगता सहा शस्त्रे
शत्रू होईल शरण निःशस्त्रे ।। ७।।
स्वामी करेल तुम्हाला समर्थ
भिऊ नको पाठीशी,
स्वामी समर्थ ।। ८।।

विलास खानोलकर
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -