कानपूर (वृत्तसंस्था) : कानपूर कसोटीत भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. त्यामुळे रहाणेच्या मुंबई कसोटीतील संघातील संधीबाबत चर्चा होत आहे. मात्र नवा प्रशिक्षक राहुल द्रविड रहाणेच्या पाठीशी आहे. रहाणेच्या खराब फॉर्मची द्रविडला चिंता नाही. लवकच रहाणे फॉर्ममध्ये परतेल असे द्रविड म्हणाला.
कानपूर कसोटीत फ्लॉप ठरल्यानंतर आणि विराट कोहली दुसऱ्या कसोटीसाठी संघात आल्यानंतर अजिंक्य रहाणेला मुंबई कसोटीत स्थान मिळेल का? या प्रश्नावर द्रविडने आपले मत मांडले. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत द्रविडला जेव्हा रहाणेचा सध्याचा फॉर्म संघाची चिंता वाढवणार आहे का?, असे विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘‘यासाठी फार काळजी करण्याची गरज नाही. साहजिकच अजिंक्यने तुमच्यासाठी जास्त धावा केल्या पाहिजेत, त्यालाही तेच हवे आहे.”
द्रविड पुढे म्हणाला, “रहाणे एक प्रतिभावान खेळाडू आहे आणि त्याने गेल्या काही वर्षांत भारतासाठी कसोटीत चांगली कामगिरी केली आहे. तो अशा लोकांपैकी एक आहे, ज्यांच्याकडे प्रतिभा आणि अनुभव दोन्ही आहे. ही फक्त एका सामन्याची बाब आहे.”
कानपूर कसोटीत शेवटच्या दिवशी भारताला शेवटच्या ५२ चेंडूंमध्ये एक विकेट घेता आली नाही. त्यामुळे हा कसोटी सामना ड्रॉ झाला. या कसोटीत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करत असलेल्या अजिंक्य रहाणेला पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयश आले. मात्र, प्रशिक्षक राहुल द्रविडला रहाणेच्या खराब फॉर्मची चिंता नाही. त्याने रहाणेचा बचाव करत तो लवकरच फॉर्ममध्ये परतणार असल्याचे म्हणाला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी ३ डिसेंबरपासून मुंबईत खेळवली जाणार आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहली पुनरागमन करेल. त्यामुळे रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यासाठी कानपूर कसोटीचा नायक श्रेयस अय्यरला वगळले जाईल का? यावर द्रविड म्हणाला, “आम्ही सध्या आमची प्लेइंग इलेव्हन कशी असेल हे ठरवलेले नाही. आमचे लक्ष फक्त कानपूर कसोटीवर होते. आम्ही मुंबईला गेल्यावर परिस्थितीची चाचणी घेऊ आणि उपलब्ध खेळाडूंच्या फिटनेसची माहिती गोळा केल्यानंतरच निष्कर्ष काढू. कोहलीही संघात सामील होणार आहे. त्यामुळे त्याच्याशीही बोलावे लागेल. त्यानंतरच निर्णय घ्यावा लागेल.” असे द्रविड म्हणाला.