सुनील सकपाळ
वनडे आणि टी-ट्वेन्टी क्रिकेटचा सध्या भडिमार असला तरी पारंपरिक कसोटी क्रिकेटची लोकप्रियता टिकून आहे. कसोटी क्रिकेटची कॅप मिळवणे, आजही प्रतिष्ठेची मानली जात आहे. कसोटी संघात स्थान मिळाल्यानंतर पदार्पणात शतक म्हणजे दुग्धशर्करा योग. मायदेशात सुरू झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये २६ वर्षीय श्रेयस अय्यरने पदार्पणात शतक ठोकण्याचा दुर्मीळ विक्रम आपल्या नावे केला आहे. पहिल्याच कसोटी सामन्यात शतक मारणारा तो भारताचा एकूण १६ वा, तर मायदेशात शतक झळकावणारा दहावा फलंदाज ठरला आहे.
२०१४मध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यानंतर आणि साडेचार हजारांहून अधिक धावा तसेच १२ शतके आणि १३ अर्धशतके गाठीला असलेल्या श्रेयसने २०१७मध्ये वनडे आणि टी-ट्वेन्टीद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यात कोरोनामुळे किमान दोन वर्षे क्रिकेट खेळता आले नाही, तरीही या मुंबईकऱ फलंदाजाच्या नावे २२ एकदिवसीय आणि ३२ टी-ट्वेन्टी सामने आहेत. वनडेत एक शतक आणि ८ अर्धशतके तसेच टी-ट्वेन्टी प्रकारात तीन हाफसेंच्युरी त्याने मारल्यात. मागील आयपीएल दरम्यान खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेतून सावरत असला तरी श्रेयससमोर दमदार पुनरागमनाचे आव्हान होते. यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये अपेक्षित फलंदाजी करता आली नसली तरी देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीच्या संघात त्याची निवड झाली.
नियोजित कर्णधार विराट कोहलीसह अनुभवी रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत मुंबईकर श्रेयसला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. त्याने संधीचे सोने केले. श्रेयसने १७१ चेंडूंत १०५ धावांची चमकदार खेळी केली. कसोटी प्रकारात संयम महत्त्वाचा असतो. त्याने साडेचार तास खेळपट्टीवर ठाण मांडताना स्वत:ला सिद्ध केलेच. शिवाय, या प्रकाराला अनुकूल स्टॅमिना, टेंपरामेंट दाखवून दिले. ओपनर शुबमन गिलने दमदार कसोटी पुनरागमन केले तरी अन्य सलामीवर मयांक अगरवाल आणि अनुभवी चेतेश्वर पुजाराला मोठी खेळी करण्यात अपयश आले. दुसऱ्या सत्रात म्हणजे ३८व्या षटकात श्रेयस मैदानावर उतरला. त्यावेळी भारताच्या खात्यात ३ बाद १०६ धावा होत्या. पुजारा परतल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेला अन्य सहकाऱ्यांकडून भक्कम साथ अपेक्षित होती. श्रेयसने कॅप्टनसह चौथ्या विकेटसाठी ३९ धावा जोडताना डाव सावरण्याचा प्रयत्न केला; परंतु रहाणे बाद झाल्याने पहिलीच कसोटी खेळणाऱ्या अय्यरवर मोठी जबाबदारी आली आणि त्याने ती लीलया पेलली. श्रेयसने सुरुवातीला सावध पवित्रा घेतला. मात्र, खेळपट्टीचा अंदाज येताच त्याने खराब चेंडूंचा समाचार घेतला. पहिल्या ५० धावा करण्यासाठी त्याला ९४ चेंडू लागले. शतकी मजल मारण्यासाठी त्याने १५७ चेंडू घेतले. याचाच अर्थ ५० ते १०० धावांचा टप्पा गाठण्यासाठी अवघे ६३ चेंडू पुरेसे ठरले. शतकासमीप किंवा सेंच्युरीच्या उंबरठ्यावर असताना अनेक अनुभवी फलंदाज कमालीचे टेन्शन घेतात. मात्र, श्रेयसने भिडस्तपणा दाखवला. दुसऱ्या दिवशी वैयक्तिक ८८ धावांवर खेळत असताना वेगवान गोलंदाज काइल जॅमिसनला सलग चौकार मारताना शतकाकडे झेप घेतली. त्याच्या पुढच्याच षटकात गलीतून चेंडूला वाट देत दोन धावा वसूल करताना श्रेयसने पदार्पणातील शतकावर शिक्कामोर्तब केले.
विक्रमवीर सचिन तेंडुलकरनंतर मुंबईकडून अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माने कसोटी संघात स्थान पटकावले आहे. मधल्या कालावधीत पृथ्वी शॉ याला संधी मिळाली. त्यानेही पदापर्णात शतक ठोकण्याची करामत साधली आहे; परंतु चांगली सुरुवात करूनही वाढत्या स्पर्धेमुळे पृथ्वी संघाबाहेर आहे. वनडे, टी-ट्वेन्टी आणि आयपीएलसह कसोटीतही आपले नाणे खणखणीत आहे, हे श्रेयसने दाखवून दिले आहे. मुंबईचे क्रिकेटपटू खडूस फलंदाज म्हणून जगप्रसिद्ध आहेत. श्रेयसच्या रूपाने आणखी एक खडूस फलंदाज देशाला मिळाला आहे.