सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेन्टी ट्रॉफी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेन्टी ट्रॉफीच्या अंतिम लढतीत कर्नाटक आणि तामिळनाडू आमनेसामने असतील. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत कर्नाटकने विदर्भचा ४ धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात तामिळनाडूने हैदराबादवर ८ विकेटनी विजय मिळवला.
विदर्भाची झुंज अपयशी
दुसऱ्या सेमीफायनलमध्ये विदर्भची झुंज अपयशी ठरली. कर्नाटकच्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांनी ६ बाद १७२ धावांपर्यंत मजल मारली. मात्र, विजयाने हुलकावणी दिली. शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी आणखी १३ धावांची आवश्यकता असताना केवळ ९ धावा निघाल्या. विद्याधर पाटीलने पहिल्याच चेंडूवर अक्षय कर्नेवारला बाद करताना विदर्भला मोठा धक्का दिला. त्यापूर्वी, अथर्व तायडे (३२ धावा) आणि गणेश सतीशने (३१ धावा) चांगली सुरुवात करून दिली. शुभम दुबे (२४ धावा), अपूर्व वानखेडेने (नाबाद २७ धावा) बऱ्यापैकी योगदान दिले तरी हाणामारीच्या षटकांत विकेट पडल्याने विदर्भची झुंज अपयशी ठरली.
कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १७६ धावांची मजल मारली. सलामीवीर रोहन कदमने ५६ चेंडूंत ८७ धावा फटकावताना संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. त्याने ७ चौकार आणि ४ षटकार लगावले. रोहनला कर्णधार मनीष पांडेची (४२ चेंडूंत ५४ धावा) चांगली साथ लाभली. या जोडीने शतकी (१३२ धावा) सलामी दिली. मात्र, दमदार सुरुवातीनंतरही मधली फळी ढेपाळली. शेवटच्या ५ षटकांत ७ विकेट पडल्या तर ४४ धावा निघाल्या. विदर्भकडून दर्शन नालकांदे (४ विकेट) सर्वात यशस्वी ठरला.
हैदराबादचा ९० धावांत धुव्वा
पहिल्या सेमीफायनलमध्ये हैदराबादचा ९० धावांनी धुव्वा उडवत हैदराबादने तामिळनाडूवर ८ विकेटनी विजय मिळवला. प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान त्यांनी १४.२ षटकांत ३४ चेंडू राखून पार केले. सलामीवीरांनी निराशा केली तरी साई सुदर्शन (नाबाद ३४ धावा) आणि कर्णधार विजय शंकरने (नाबाद ४३ धावा) आरामात विजय मिळवून दिला. मात्र, हैदराबादचा विजय पूर्वार्धातच नक्की झाला. त्याचे क्रेडिट मध्यमगती गोलंदाज पी. सरवना कुमारला (५ विकेट)जाते. त्याने ३.३ षटकांत २ षटके निर्धाव टाकताना अवघ्या २१ धावा देत निम्मा संघ गारद केला. त्याला मुरुगन अश्विन तसेच एम. मोहम्मदची (प्रत्येकी २ विकेट) चांगली साथ लाभली. हैदराबादचा १८.३ षटकांतच शंभरी भरली. त्यात मधल्या फळीतील तनय त्यागराजनचे (२५ धावा) सर्वाधिक योगदान राहिले.