Saturday, April 26, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेकुडूस येथे भूमिपुत्र कामगारांचे आक्रोश आंदोलन

कुडूस येथे भूमिपुत्र कामगारांचे आक्रोश आंदोलन

अनंता दुबेले

कुडूस : तालुक्यातील नारे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सेंट गोबेन (जिप्सम) या कंपनीने भूमिपुत्र कामगारांना अनेक वर्षे काम केले असतानाही ६०-७० कामगारांना काहीही कारण नसताना कामावरून काढून टाकले आहे. या कामगारांना कामावर घेण्यात यावे या व अन्य मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज भूमिपुत्र कामगारांनी भिवंडी-वाडा महामार्गावरील कुडूस नाका येथे सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेऊन एक सर्व खात्यांच्या प्रमुखांची बैठक बोलावून यावर मार्ग काढू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

‘नोकरी आमच्या हक्काची; नाही कुणाच्या बापाची’, ‘भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी कुडूस नाका दणाणून गेला होता.

नारे ग्रामपंचायत हद्दीत सेंट गोबेन इंडिया (जिप्सम) ही कंपनी असून या कंपनीत पीओपी पावडरचे उत्पादन घेतले जाते. कंपनी प्रशासनाने स्थानिक कामगारांना किरकोळ कारणे दाखवून ६०-७० कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. एवढेच नव्हे, तर कंपनी प्रशासनाने स्थानिकांबाबतीत संताप आणि चीड आणणारी वक्तव्ये केली आहेत. कामावरून कमी केलेल्या कामगारांच्या जागी परजिल्ह्यातील ३५ अभियांत्रिकीधारकांची भरती केली आहे. हे भरती केलेले कामगार नागपूर, सांगली, कोल्हापूर, नाशिक या भागांतील आहेत. याला विरोध करण्यासाठी व कामावरून काढून टाकलेल्या कामगारांना कामावर घेण्याच्या मागणीसाठी सोमवारी कुडूस नाका येथे सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन छेडले.

या आंदोलनाची दखल तहसीलदार उद्धव कदम यांनी घेतली व ते आंदोलनस्थळी पोहोचले. त्यानंतर कदम यांनी कंपनीच्या व्यवस्थापकांना आंदोलनस्थळी बोलावून घेतले. स्थानिक भूमिपुत्र कामगारांविरोधात कंपनी प्रशासनाने केलेल्या वक्तव्यांबाबत व्यवस्थापकांनी माफी मागावी, अन्यथा आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेऊन व्यवस्थापकांसोबत चर्चा झाली. या चर्चेत येत्या सोमवारी (दि. २२) तहसीलदार, पोलीस अधिकारी, कामगार आयुक्त, प्रदूषण विभाग व जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी, कामगार नेते, पदाधिकारी व कामगार यांच्यात बैठक होऊन या बैठकीत मागण्याचे निरसन करून त्यावर मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

या आंदोलनात माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, पराग पष्टे, प्रफुल्ल पाटील, रोहिदास पाटील, उमेश पटारे, मिलींद चौधरी, धनंजय पष्टे, दीपक मोकाशी, भरत गायकवाड, रेश्मा पाटील, जर्नादन भेरे, दीपक पाटील, विशाल गावळे-पाटील, नीलेश पाटील आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व कामगार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -