Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यअकरावी प्रवेश वेळीच होणे गरजेचे...

अकरावी प्रवेश वेळीच होणे गरजेचे…

रवींद्र तांबे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने राज्यातील नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च, २०२३ च्या दहावीच्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या. त्याचा निकाल ऑनलाइन पद्धतीने २ जून, २०२३ रोजी लागला. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात गुणपत्रिका देण्यातही आल्या. दहावीची गुणपत्रिका मिळाल्यानंतर ऑनलाइन प्रवेश पद्धतीचा दुसरा भाग सुद्धा भरण्यात आला. काही ठिकाणी ऑफलाइन असल्याने मुलांचे प्रवेश अर्ज भरून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून अकरावीचे वर्ग सुरू करण्यात आले. आता ऑगस्ट महिना सुरू होऊन दुसरा आठवडा झाला. दोन दिवसांपूर्वी मला बोरिवलीत अकरावीमध्ये प्रवेश घेतलेली माझ्या नातेवाइकांची मुलगी भेटली तिला मी म्हणालो तुझी अकरावी सुरू झाली का? हो, काका ५ ऑगस्टपासून. तरी अजून मुंबईतील अनेक कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचे वर्ग सुरू झालेले नाहीत. मग सांगा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार.

महत्त्वाची बाब म्हणजे, ग्रामीण भाग वगळता शहरी भागात मागील आठवड्यापासून काही अकरावीचे वर्ग सुरू झाले आहेत. यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दुसऱ्या वर्षी पुन्हा बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी अकरावीचे वर्ग वेळीच सुरू होऊन वेळेवर परीक्षा व्हायला हव्यात. म्हणजे पुढील परीक्षेची तयारी करायला विद्यार्थ्यांना वेळ मिळेल.

अकरावीचे वर्ग सुरू होतात तेव्हा थोडक्यात महाविद्यालयाची ओळख नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत. त्यात प्रत्येक मुलांना गुलाबाचे फूल देणे. त्यानंतर गोड खाऊ देऊन पहिल्या दिवशी लवकर घरी सोडणे. याचा अर्थ असा नव्हे की, महाविद्यालयाची जबाबदारी संपली तेवढीच त्यांची जबाबदारी वाढली असे म्हणता येईल. विद्यार्थ्यांचे स्वागत जरी करण्यात आले तरी आतापासून आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे, असे सांगावे लागेल. खरी परीक्षा आता आहे. जरी आपण शाखेची निवड केली म्हणजे आपली जबाबदारी संपली असे म्हणतात येणार नाही. आपल्या आवडीच्या शाखेची निवड करून त्या शाखेचे ज्ञान कसे आत्मसात करता येईल त्यानंतर ती पदवी घेऊन नोकरी कशी मिळविता येईल ही जबाबदारी आता विद्यार्थ्यांची असेल. तेव्हा आतापासून विद्यार्थ्यांची खरी कसोटी सुरू झाली असे म्हणता येईल.

अकरावी सोडा खरी परीक्षा ही बारावीची असते. त्यावरून एखादा कोर्स करावा की पदवी पूर्ण करावी हे ठरत असते. त्यासाठी कोणत्याही प्रकारची दिरंगाई आतापासून करून चालणार नाही. विद्यार्थी दशेतच स्वत:चा निर्णय स्वत:च घेता आला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या पुढील भवितव्याचा विचार करून अकरावीच्या प्रवेशाला विलंब करू नये. दहावीचा निकाल लागल्यावर शिक्षण विभागाने पूर्ण वर्षाचे वेळापत्रक बनवून प्रत्येक महाविद्यालयाला द्यावे. यामध्ये दहावीचा निकाल लागल्यानंतर या काळात प्रवेश प्रक्रिया पार पाडावयात. नंतर अभ्यासक्रमाची आखणी करावी. यात अभ्यासक्रम परीक्षा यात छोट्या व मोठ्या सुट्ट्या यामध्ये राष्ट्रीय दिन, राष्ट्रीय नेत्यांच्या जयंत्या, गणेश चतुर्थी, दीपावली, क्रीडा महोत्सव कोणत्या तारखला येतात त्याप्रमाणे सुट्ट्या जाहीर करून शैक्षणिक आराखडा तयार करावा. त्याप्रमाणे अभ्यासक्रम, परीक्षा, सुट्ट्या व अन्य उपक्रम वेळच्या वेळी राबविण्यात याव्यात. ही सर्व जबाबदारी माध्यमिक विभागाची असेल. म्हणजे विद्यार्थ्यांना पुढील वर्षाचे टेन्शन येणार नाही. अकरावीपेक्षा बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी कलाटणी देणारे वर्ष असते. अकरावीच्या परीक्षा लवकर घेतल्या, तर बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळू शकतो.

शहरात महाविद्यालयातील शिकवणी नामधारी असते. त्यांचा सर्व अभ्यास खासगी शिकवणीमध्ये केला जातो. यात काही विद्यार्थ्यांना खासगी शिकवणुकीची फी परवडत नसल्याने तिकडे जात नाही. बरेच विद्यार्थी स्वत: कमवून शिक्षण घेत असतात. त्यात पावसाळ्यातील चार महिने अतिशय महत्त्वाचे असतात. ही सर्व परिस्थिती गृहीत धरून राज्यातील शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी व आपल्या प्रतिष्ठेसाठी प्रवेश प्रक्रिया वेळीच घेऊन अकरावीचे वर्ग सुरू करण्यात यावेत. यात विद्यार्थ्यांचे भवितव्य पारदर्शकप्रमाणे डोळ्यांसमोर ठेवावे. प्रवेश प्रक्रिया गुंतागुंतीची न करता विद्यार्थ्यांच्या सोयीची करावी. उदाहरणार्थ मेरिट लिस्ट लावल्यानंतर त्याखाली योग्य त्या सूचना विद्यार्थ्यांना द्याव्यात. त्यानंतर तारखांची अदलाबदल करू नये. त्यात दुसऱ्या दिवशी वेबसाईट बंद केली जाते. यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडतात. नंतर सांगितले जाते वेबसाईट पाहत बसा. मग सांगा इतकेच काम विद्यार्थ्यांना आहे का?

ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा तेव्हा प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे खंड पडणार नाही याची शिक्षण विभागाने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक महाविद्यालयात माहिती केंद्राची स्थापना करावी. शक्यतो फोन नंबर अचूक द्यावा. मोबाइल नंबर देण्यापूर्वी मोबाइल चार्जिंग करून द्यावा. बऱ्याच वेळा विद्यार्थी फोन करून सुद्धा फोन लागत नाही. त्यानंतर प्रत्यक्षात विद्यार्थी जाणेच पसंत करतात. गेल्यावर मधून आवाज येतो, बॅटरी संपली होती, चार्जर मिळत नव्हता, आता दुपारनंतर मोबाइल सुरू होईल. तेव्हा विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अशी कारणे पुढे करण्यापेक्षा त्यांचा उत्साह अधिक कसा वाढेल या दृष्टीने प्रयत्न करावा. त्यासाठी अकरावीचे प्रवेश वेळीच होणे गरजेचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -