मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईकरांसाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून मुंबईतील विविध ठिकाणी जाण्यासाठी सोमवारपासून २४ तास बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला ऑक्टोबर २०२१ पासून वातानुकूलित सेवा बेस्टने सुरू केली होती. ही बस सेवा आता २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई विमानतळापासून बॅकबे तसेच वाशी आणि ठाण्यासाठी टप्प्याटप्प्यात बससेवा सुरू केली आहे.
विशेष म्हणजे ही सेवा २४ तास उपलब्ध राहणार असून बॅकबेपर्यंतचे एका प्रवाशाचे प्रवास भाडे १७५ रुपये, ठाणे तसेच वाशीपर्यंतचे भाडे १५० रुपये असेल, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली.
विमानतळाहून येणारे प्रवासी किंवा कामावरून मध्यरात्री सुटणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. दरम्यान विमानतळ एक येथून रात्री ११ ते पहाटे ७ पर्यंत दर दोन तासांनी, तर बॅकबे येथून मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते सकाळी ८ वाजेपर्यंत दर दोन तासांनी बस सेवा उपलब्ध होणार आहे.
केवळ दक्षिण मुंबईच नाही तर वाशी भागातही बस सेवा मिळणार आहे. वाशीसाठीही रात्री सव्वा अकरा ते पहाटे सव्वा सात वाजेपर्यंत आणि वाशी येथून विमानतळासाठी मध्यरात्री सव्वा बारापासून ते पहाटे सव्वा आठ वाजेपर्यंत बससेवा असणार आहे. ठाण्यासाठी रात्री साडेअकरा वाजल्यापासून ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत आणि ठाणे ते विमानतळासाठी मध्यरात्री साडेबारा ते सकाळी ८.३० वाजेपर्यंत दर दोन तासांनी बससेवा असतील.